
ॲग्रोवन वृत्तसेवा
BAIF,Pune : पुणे ः भविष्यात जागतिक पातळीवर प्रथिने सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होणार आहे. विविध वाण संपुष्टात येत असताना, आपण सध्या केवळ अन्नधान्यांचे सत्त्व नसलेले ‘ब्रॅण्ड’ खात आहोत. आपल्या ताटातील खाद्यपदार्थांमध्ये वैविध्य वाढवायचे असेल, तर देशी वाणांचे केवळ संवर्धन करून, ते गाडगे मडक्यात न ठेवता त्याची प्रत्यक्षात शेती होणे गरजेचे आहे. असे मत बाएफचे देशी वाण संवर्धक डॉ. संजय पाटील यांनी केले.
गोएथ संस्था, बाएफ, फर्ग्युसन महाविद्यालय, ग्राम संस्था, नवरोजी गोदरेज सेंटर फॉर प्लान्ट रिसर्च या संस्थांच्या वतीने तीनदिवसीय आयोजित ‘बीजकथा’ परिसंवादात उद्घाटन सत्रात शुक्रवारी (ता.२३) डॉ. पाटील बोलत होते.
या वेळी डॉ. पाटील म्हणाले, ‘‘शेतीचा आत्मा हे बियाणे आहे. मात्र बियाण्यांमधील सत्त्व संपत चालले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज हे केवळ संत नव्हते, तर ते कृषी शास्त्रज्ञ होते. त्यांच्या सुमारे साडेचार हजार ओव्यांमध्ये शुद्ध बियाणे संवर्धन, लागवड याबाबत मार्गदर्शन केले आहे. देशी बियाणे संवर्धनात ग्रामीण आदिवासी भागात अनेकांनी मोठे काम उभे केले आहे. त्यांच्यावर पीएचडी करता येईल, त्यांच्यावर १०० पेक्षा जास्त प्रबंध लिहिता येतील असे शेतकरी संशोधक आहेत. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.’’
‘‘आपल्याकडे अनेक ठिकाणी आता बीज बँका तयार झाल्या आहेत. बियाणे ही एक संस्कृती आहे. त्या संस्कृतीचे केवळ संवर्धन न होता, त्या आता केवळ शो केस आणि गाडगी मडक्यात ठेवून चालणार नाही, तर लागवड करून त्या बीजांचा प्रसार होऊन त्यांचा वापर होणे गरजेचे आहे. कारण जोपर्यंत हे बियाणं जिवंत होत नाही, तोपर्यंत त्याचे जतन करून काय होणार, असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला.
या वेळी बीजकथा परिसंवादामागील भूमिका आयोजक अभिजीत पाटील यांनी मांडली.
बीजसंवर्धकांशी संवाद
बीजकथा कार्यक्रमाच्या निमित्ताने भिलक्या दिंडा (जव्हार), ममताताई भांगरे (देवगाव अकोले) गंगुबाई घोडे, (नंदूरबार) रंजना ब्रामणे, बाळू घोडे, मांवजी पवार यांनी उपस्थितांसोबत संवाद साधत देशी बियाणे संवर्धनाबाबतची माहिती दिली. बीज संवर्धकांनी संवर्धन केलेल्या विविध बियाण्यांचे प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आले. भिलक्या दिंडा यांनी तारपा वादनाने कार्यक्रमांची सुरुवात केली.
पुणे जिल्ह्यातील भाताचे ३०० वाण लुप्त
जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव, भीमाशंकर परिसरात भाताचे सुमारे ३०० वाण होते. यामधील बहुतांश वाण लुप्त झाले असून, आता जो भात आपण खात आहोत. तो केवळ सत्त्वहीन ब्रॅण्ड आहे. यामुळे सात्त्विक भात खाण्यासाठी त्या वाणांचे संवर्धन आणि प्रसार होणे गरजेचे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.