
Solapur News : देशात आब्यांचे मोठ्याप्रमाणात उत्पादन होते, आंबा उत्पादनातील आघाडीवरचा देश म्हणून आपली ओळख आहेच, पण शेतकऱ्यांनी आंब्याच्या योग्य व्यवस्थापनासोबत मार्केटिंगचाही अभ्यास करावा, असे मत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. केशव पुजारी यांनी रविवारी (ता. ३) येथे व्यक्त केले.
कृषी विभाग आत्मा व महादेश फार्मर कंपनीच्या वतीने श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात आयोजित ‘महाआंबा कार्यशाळा’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी श्री स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, सकाळ सोलापूरचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधक्षीक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, महादेश शेतकरी कंपनीचे अध्यक्ष सचिन नलावडे, आत्माचे निवृत्त कृषी उपसंचालक विजयकुमार बरबडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा.डॉ. पुजारी म्हणाले, की आंबा लागवडीतून अधिक उत्पादन आणि नफा मिळवायचा असेल, तर लावणीपासून ते काढणीपर्यंत, जमिनीची निवड, हवामान, जातींची माहिती, कीडरोग नियंत्रण अशा सर्व बाबींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. यासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांच्या मदतीने व्यवसायिक पद्धतीने लागवड करावी.
केशर आंब्यात एव्हिटॅमिनचे प्रमाण अधिक असून, हापूसची चव अत्यंत लोकप्रिय आहे, पण बाजारपेठेचा अभ्यास न केल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित नफा मिळत नाही, असे ते म्हणाले. श्री. शिवदारे आणि श्री. गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भोसले यांनीही आंब्याच्या उत्पादनासह मार्केटिंगवर भर देण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. बरबडे यांनी या कार्यशाळेचा उद्देश सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर जोशी यांनी केले.
आंबा पुस्तिकेचे प्रकाशन
यावेळी बरबडे यांनी लिहिलेल्या ‘आंब्यावरील कीडरोग व्यवस्थापन` या विषयावरील लघुपुस्तिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दिवसभराच्या तांत्रिक सत्रात आंबा लागवडीचे व्यवस्थापन, आंबा काढणी, काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि आंबा प्रक्रिया या विषयावर महादेश शेतकरी कंपनीचे अध्यक्ष सचिन नलावडे, उपाध्यक्ष तानाजी वाडीकर यांनी मार्गदर्शन केले.
...तरीही निर्यातीत मागे
भारतात सध्या ४ लाख ८५ हजार हेक्टरवर आंब्याचे उत्पादन घेतले जाते, त्यातून १२ लाख १२ हजार मेट्रिक टन उत्पादन होते. आंब्याच्या १३२० हून अधिक जाती आहेत, मात्र भारतात केवळ २५ ते ३० जाती व्यापारी दृष्टिकोनातून पिकवल्या जातात. यामध्ये हापूस, केशर, तोतापुरी, रत्नापुरी, सिंधु, राजापुरी यांचा समावेश आहे. त्यात पुन्हा निर्यातीतही आपण मागे आहोत, प्रा. डॉ. पुजारी म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.