
Sharad Pawar Speech in Aurangabad : देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपचे सरकार नाही, जनतेला आता बदल हवा आहे. तो घडविण्याच्या उद्देशानेच आम्ही सर्व विरोधी पक्ष ‘इंडिया’च्या माध्यमातून नवी आघाडी स्थापन केली आहे. कोणत्याही परिस्थितीत देशात बदल घडवायचा आहे, जनतेची देखील तीच इच्छा असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निक्षून सांगितले.
छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी (ता. १६) पत्रकारांशी बोलताना श्री. पवार यांनी देश आणि राज्यातील राजकीय सद्यःस्थितीवर आपली भूमिका मांडली.
श्री. पवार म्हणाले, की देशातील दिल्ली, पंजाब, झारखंड, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही. महाराष्ट्रात आता आली, ती कशा पद्धतीने हे तुम्ही पाहिले आहे. यावरून देशातील जनतेला आता बदल हवा आहे, हे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे जे जे भाजप विरोधी असतील त्या सगळ्या पक्षांना ‘इंडिया’ आघाडीच्या अंतर्गत सोबत घेऊन हा बदल घडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही श्री. पवार यांनी स्पष्ट केले. मोदी सरकार हे देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.
जातीजातींमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. १४ ऑगस्ट हा फाळणी दिवस म्हणून साजरा केला जावा, अशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि फोडाफोडीच्या राजकारणाला लोक कंटाळले आहेत. भाजपसोबत आम्ही जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, हे मी याआधीही स्पष्ट केले आहे.
पाऊस नसल्याने मराठवाड्यासह अनेक भागांतील स्थिती चिंताग्रस्त बनली आहे. अशावेळी हवामान खात्याने पाऊस येण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यांचं खरं ठरलं तर त्यांच्या तोंडात कारखान्याची साखर पडो. अशा वेळी केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असल्याचे श्री. पवार म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.