Takari Scheme : सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यात अखेर ताकारी योजनेचे पाणी सुरू

Upsa Irrigation Scheme : ताकारी उपसा सिंचन योजनेतून यंदाच्या रब्बी हंगामासाठीचे पहिले पाणी आवर्तन गेल्या दोन दिवसापासून सुरू झाले.
 Irrigation Scheme
Irrigation SchemeAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
Sangali News : सांगली ः
ताकारी उपसा सिंचन योजनेतून यंदाच्या रब्बी हंगामासाठीचे पहिले पाणी आवर्तन गेल्या दोन दिवसापासून सुरू झाले. हे पाणी सलग ४० दिवस दिले जाणार असून मुख्य कालव्याच्या शेवटी १४४ किलोमीटरपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.

यंदा जिल्ह्यातील दुष्काळी टापूतील कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यात कसलाच पाऊस न पडल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. ताकारी योजनेतून पावसाळ्यात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पिके कशीबशी तरली. मात्र मागील पंधरवड्यापासून सर्वत्र ‘पाणीबाणी’ निर्माण झाली आहे.

परिणामी लाभक्षेत्रातून मागणी होत होती. त्यास अनुसरून आठ दिवसांपूर्वी कालवा समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार ताकारी योजनेचे रब्बीसाठी पहिले आवर्तन १ नोव्हेंबरला सुरू होणार होते. मात्र कृष्णा नदीत अडविण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने ते उचलून पुढे ढकलले जात होते. त्यामुळे लाभक्षेत्राची धाकधूक वाढत होती.

 Irrigation Scheme
Takari Upasa Yojana : ताकारी योजनेचे पाणी ४४ किलोमीटरपर्यंत पोहोचले

अखेर साटपेवाडी बंधाऱ्यात अपेक्षित पातळी मिळताच टप्पा १ वरील ७ पंप सुरू करून पाणी सागरेश्वरमधील संतूलन जलाशयात सोडण्यात आले. याठिकाणी ५ तास पाणी साठवण केल्यानंतर दुपारी ३ वाजता टप्पा २ वरील ३ पंप सुरू करून पाणी मुख्य कालव्यात सोडण्यात आले. या पाण्यामुळे बारमाही सिंचनक्षेत्राला दिलासा मिळून पिके वाचणार आहेत. तसेच रब्बीचे क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.

मुख्यत्वे लाभक्षेत्रातील गावांचा गंभीर झालेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघल्याने शासनाची चिंता मिटली आहे. सुरू झालेले पाणी प्रथमतः मुख्य कालव्याच्या ० ते २० किलोमीटरवरील पोटकालव्यांना सोडले जाणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने ते पुढील कालव्यास दिले जाणार आहे. या वर्षीची कोयना धरणातील पाण्याची उपलब्धता लक्षात घेता सर्वांनीच पाणी जपून वापरण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


कृष्णा नदीतील पाण्याची आवक अभ्यासून टप्पा १ व २ वरील पंप वाढविले जाणार आहेत. प्रत्येकी किमान १० पंप सुरू करण्याचे नियोजन असून सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला जाणार आहे. दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा
- राजन डवरी,
कार्यकारी अभियंता, ताकारी योजना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com