
Pune News : सध्या पर्यावरण संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. परंतु शासनाच्या योजनांव्यतिरिक्त पर्यावरण संवर्धनासाठी कोणी ठोस पावले उचलताना दिसत नाहीत. परंतु एका पर्यावरण प्रेमीने घेतलेल्या निर्णयाने सर्वत्र कौतुक होत आहे.
पर्यावरणप्रेमी सुमित राठोड यांनी आपल्या चिमुकल्या मुलीच्या वाढदिनी देशी बियांची तुला केली. यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी मोठा हातभार लागणार आहे.
आपल्या शुभ कार्यात कोणत्याही वस्तुंची तुला करून ती दान करत असतो अशी परंपरा आहे. अगदी राजे महाराजांच्या काळात सोन्याची तुला व्हायची तर जसा काळ बदलला तसा तुला करण्याच्या पद्धतीही बदलत गेल्याचे आपण पाहिले आहे. क्षमतेनुसार कुठे धान्याची तर वाचन चळवळ टिकवण्यासाठी पुस्तकांची तुला होता असल्याचे आपण बघितलं आहे.
पण सुमीत राठोड या पर्यावरणप्रेमी पालकाने आपल्या मुलीची तुला देशी बियांनी केली. त्या बियांपासून रोपे तयार करून त्याची रोपे अनेक ठिकाणी लावण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी त्याचा फायदा होणार आहे. राठोड यांच्या या उपक्रमाची जोरदार चर्चा होत आहे. तसेच त्यांच्या कार्याचे पर्यावरण प्रेमींकडून कौतुकही होत आहे.
पुण्यासारख्या ठिकाणी सिमेंटची जंगलं बनत असताना पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी त्यांनी मुलीच्या वजनाएवढ्या बियांची तुला केल्याने नवा आदर्श घातला आहे. राठोड यांनी घातलेल्या पायंडामुळे इतर ठिकाणीही हा उपक्रम राबवण्यासाठी भर देऊन प्रयत्न होणार आहेत.
सुमित राठोड यांनी तुला केलेल्या बिया स्वत:च्या परिसरात लावणार आहेत. तसेच काही बिया महाराष्ट्र वृक्षसंवर्धिनीचे प्रणेते प्रिया व सुनील भिडे या दाम्पत्याकडे देणार आहेत तसेच देवराईचे रघुनाथ ढोले यांच्याकडेही काही बियां सुपूर्द करणार आहेत. भिडे आणि ढोले यांच्याकडे या बियांपासून रोपे तयार होतील. त्यानंतर ठिकठिकाणी वाटप केले जाईल असे राठोड यांच्याकडून सांगण्यात आले.
वृक्षसंवर्धन चळवळ टिकली पाहिजे...
यावेळी महाराष्ट्र वृक्षसंवर्धीनीच्या प्रिया भिडे म्हणाल्या सुमित राठोड यांनी आपल्या मुलीच्या जन्मदिनी हा केलेल स्तुत्त्य आहे. यापूर्वी मी अन्नधान्याची तुला करून दान करण्याची परंपरा पाहिली आहे. तशी बीज तुला करून वृक्षांच्या बिया सुयोग्य हातात गेल्यास ही वृक्ष चळवळ मोठी होण्यास हातभार लागेल. इतरांनी देखील याचा अवलंब केला पाहिजे. ही तुला अतिशय समृध्द करणारी आहे. पालकांनी याचा जरूर विचार करावा असे त्या म्हणाल्या.
दरम्यान मागच्या काही काळापासून महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीतर्फे बीजांकूर अभियान राबविले जाते. त्यात वनस्पतींच्या बिया संकलित करून संस्थेकडे सुपूर्द करावयाच्या आहेत. किमान पाच प्रकारच्या बिया देण्याचे आवाहन भिडे यांनी केले. त्या दिल्यानंतर त्यांना प्रमाणपत्रही देण्यात येणार असल्याचे भिडे यांनी सांगितलं या उपक्रमास राज्यातून प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.