
New Delhi News: शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा तत्काळ करण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या खासदारांनी केंद्रीय खत व रसायनमंत्री जे. पी. नड्डा यांच्या संसदेतील दालनाबाहेर गुरुवारी (ता. ७) ठिय्या आंदोलन केले.
या वेळी त्यांनी ‘खतं द्या, खतं द्या... महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खतं द्या’ अशी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या आंदोलनामध्ये काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे, डॉ. शिवाजीराव कळगे, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, बळवंत वानखेडे, शोभा बच्छाव आदी सहभागी झाले होते.
या आंदोलनानंतर मंत्री नड्डा यांनी काँग्रेसच्या खासदारांची भेट घेऊन चर्चा केली. राज्यातील खताच्या पुरवठ्याबद्दल संध्याकाळी सचिवांसोबत बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करू, अशी ग्वाही मंत्र्यांनी दिल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले. ‘केंद्र सरकारने निश्चित केलेल्या खतांचा कोटा पूर्ण दिला नाही. त्यामुळे राज्यात ऐन खरीप हंगामात खतटंचाई निर्माण झाली आहे.
आम्ही यावर निवेदन देण्यासाठी खत व रसायनमंत्र्यांना मागील चार दिवसांपासून भेटण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु मंत्री वेळ देत नव्हते. त्यामुळे दालनासमोर आंदोलन करावे लागले. आंदोलनानंतर चर्चेसाठी बोलवण्यात आले,’ असे डॉ. काळे यांनी माध्यमांना सांगितले. मंत्री नड्डा यांना खासदारांच्या सह्यांसह निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये खताच्या वाढत्या टंचाईसह उत्पादनातील घट आणि शेतकरी आत्महत्यांकडे लक्ष वेधलं आहे. तसेच केंद्र सरकारने राज्यासाठी निश्चित केलेल्या खत कोट्याची आठवण मंत्र्यांना करून देऊन केवळ आश्वासनावर शेतकऱ्यांची बोळवण करू नये, अशी मागणी केली आहे. केंद्र सरकारकडे तेलंगणा, कर्नाटकने खतांची मागणी केली. परंतु त्यावर खताचा कोटा पूर्ण झाल्याचे उत्तर देण्यात आले. त्यामुळे खत टंचाईचा मुद्दा गंभीर होण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.