
डॉ. योगेश पाटील, डॉ. स्वाती मुंढे
Gandual Khat : जमिनीची पोत, उत्पादन क्षमता टिकविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर महत्त्वाचा आहे. यासाठी गांडूळ खताचा वापर महत्त्वाचा ठरतो.
गांडूळ खतनिर्मिती
१) गांडूळ खतनिर्मिती करण्यासाठी तयार केलेल्या ढिगामधून पाण्याचा योग्य निचरा सोबतच ४० ते ५० टक्के ओलावा टिकावा याची काळजी घ्यावी.
२) ढिगातील तापमान २० ते ३० अंश दरम्यान असावे. तसेच पूर्णवेळ सूर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घ्यावी.
३) ढिगातील गांडुळांचे वाळवी, बेडूक, साप, मुंग्या, गोम, उंदीर यांच्यापासून संरक्षण करावे.
गांडूळ खतासाठी ढीग तयार करण्याची पद्धत :
१) सुरुवातीला ढिगाच्या बुडाशी १५ सेंटिमीटर जाडीचा सेंद्रिय पदार्थाचा म्हणजेच गव्हाचे काड, उसाचे पाचट, सोयाबीन व तुरीचा पालापाचोळा यांचा थर करावा.
२) सेंद्रिय पदार्थांचा थरावर अर्धवट कुजलेले शेणखत व माती ३:२ प्रमाणात मिसळावी.
३) पाण्यामध्ये शेण कालवून १० सेंटिमीटर जाडीचा तिसरा थर तयार करावा. सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. कुजलेले अवशेष गांडुळाला खाद्य म्हणून उपयुक्त राहील.
४) शेवटी ढिगावर सेंद्रिय पदार्थांचे १५ सेंटिमीटर जाडीचे आच्छादन करावे. आवश्यकतेनुसार दररोज किंवा दिवसाआड तयार झालेल्या ढिगावर पाणी शिंपडावे.
५) साधारणत: एक ते दोन आठवड्यांनी ढिगातील उष्णता कमी झाल्यावर त्यावरील सेंद्रिय पदार्थांचा थर बाजूला सारून प्रौढ गांडुळे सोडावीत.
६) गांडूळ सोडल्यावर पुन्हा सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे, नियमित पाणी द्यावे.
७) गांडूळ खतनिर्मितीसाठी जवळपास दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो.
८) उत्तम प्रतीच्या गांडूळ खताचा रंग काळसर तसेच चहापत्तीसारखा झाल्यास समजावे की गांडूळ खत तयार झाले आहे. गांडूळ खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे.
गांडूळ खताचे फायदे :
१) गांडूळ खतात ह्युमसचे प्रमाण अधिक असल्याने नत्र, स्फुरद, पालाश तसेच दुय्यम अन्नद्रव्ये व सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात.
२) जमिनीची उत्पादकता आणि पोतामध्ये सुधारणा होते. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य बदल होतात.
३) जमिनीत गांडुळांची संख्या वाढल्याने नैसर्गिकरीत्या मशागत होऊन पिकांच्या योग्य वाढीस मदत होते.
४) जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, धूप कमी होण्यास मदत होते.
५) पिकाच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीच्या सामूची उपयुक्त पातळी राखली जाते.
६) जमिनीतील गांडुळांमुळे मातीच्या थराची उलथापालथ होते. त्यामुळे जमिनीत खोलवर असणाऱ्या पिकासाठी उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.
७) जमिनीचा कस टिकून राहतो. उत्पादन क्षमतेसोबतच जमीन सुपीक होऊन हवा खेळती राहते. त्यामुळे पिकांमध्ये पांढऱ्या मुळीची योग्य प्रकारे वाढ होते.
संपर्क - डॉ. योगेश पाटील, ९६६५५९९८९९, (श्री धनेश्वरी मानव विकास मंडळ, कृषी महाविद्यालय, गेवराई तांडा, जि. छत्रपती संभाजीनगर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.