
भारतात कपाशीचे क्षेत्र खूप मोठे आहे. भारतामध्ये सर्वाधिक उत्पादकता पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात मध्ये मिळते. बागायती लागवडीखालील अधिक क्षेत्र हे याचे प्रमुख कारण आहे. हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीत बीटी कपाशीचे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. अधिक किंमतीचे बियाणे, रासायनिक खते कीडनाशकांवरिल वाढता खर्च व बीटी कपाशीच्या उत्पादनातील घट यामुळे कपाशीचे उत्पादन तोट्यात जात आहे. हे लक्षात घेऊन कपाशीचे उत्पादन वाढविण्यासाठी तेलंगणा राज्यातील प्रा. जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठातील संशोधकांनी कापूस पिकात सघन लागवडीचा प्रयोग केला आहे. या लागवड पद्धतीचा अवलंब केल्यामुळे कापूस उत्पादनात ३० ते ५० टक्क्यांची वाढ झाल्याचे येथील संशोधकांना दिसून आलयं.
प्रा. जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठ आणि राज्य कृषी मंत्रालयाच्या शास्त्रज्ञांतर्फे तेलंगणा राज्यातील सुमारे २६ जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात ८,०९३ हेक्टर क्षेत्रावर सघन कपाशी लागवडीचे प्रात्यक्षिके घेण्यात आली. एकरी ७ ते ८ हजार रोपांच्या तुलनेत सुमारे २१ ते २२ हजार रोपांची लागवड करण्याचे लक्ष ठेवले. हंगामाच्या सुरुवातीलाच जवळपास अडीच महिने मुसळधार पावसाने पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला. पाऊस थांबल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र पीक सावरले. पिकाची वाढ नियंत्रीत आणि एकसमान उंचीवर राहण्यासाठी वाढरोधकाचा वापर करण्यात आला. त्यामुळे कपाशीची कापणी यंत्रांने करणे सोपे झाले. यातून कपाशीचे एकरी ६ ते ८ क्विंटलच्या तुलनेत एकरी ८ ते १२ क्विंटल उत्पादन मिळाले. अशी माहिती प्रा. जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक आर. जगदीश्वर यांनी दिली.
सामान्यपणे कापूस लागवडीसाठी जेवढे बीयाणे लागते त्याच्या तीनपट जास्त बीयाणे सघन कापूस लागवडीसाठी लागते. पिकाच्या काढणीसाठी वेळ आणि मजूरही जास्त लागतात त्यामुळे मजुरीवर जास्त खर्च येतो. तरिही वाढीव उत्पादनामुळे सघन कापूस लागवड पद्धत तेलंगणातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली. त्यामुळे पुढील वर्षी तेलंगणातील जास्तीत जास्त शेतकरी कापसाची लागवड सघन पद्धतीने करण्याची शक्यता आहे.
सघन कापूस लागवडीचे प्रयोग महाराष्ट्रातही झाले आहेत. सघन कपाशी लागवडीचा मुख्य उद्देश हा प्रती हेक्टरी झाडांची संख्या जास्त ठेऊन उत्पादनवाढ साधने हा असतो. नागपूर येथील केंद्रिय कापूस संशोधन संस्थेद्वारे विदर्भात सघन कापूस लागवडीची प्रात्यक्षिकं घेण्यात आली. यामध्ये संकरित बीटी कपाशीच्या वाणांची लागवड करण्यात आली. काही खासगी बीयाणे कंपान्यांद्वारेही वदर्भातील काही जिल्ह्यामध्ये लागवडीचे प्रयोग सुरु आहेत. सघन कापूस लागवड ही कोरडवाहू प्रकारच्या मध्यम ते हलक्या प्रतीच्या जमिनीत फायदेशीर आहे. यामध्ये ३ फूट बाय अर्धा फूट अंतरावर कापसाची लागवड केली जाते. साधारण १५० दिवसांत कापूस वोचणीसाठी तयार होतो. कपाशीची वाढ मर्यादीत राहण्यासाठी वाढ रोधकांचा वापर केला जातो. या लागवड पद्धतीचा अवलंब केल्यास २० टक्क्यांपर्यंत उत्पादनात वाढ दिसून आली आहे. एकूणच महाराष्ट्रातही ही सघन कापूस लागवड फायदेशीर आहे. फक्त जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन लागवड केली पाहिजे अशी माहिती नागपूर येथील केंद्रिय कापूस संशोधन संस्थेच्या कृषी विद्या विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. वेणूगोपालन यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.