
Kolhapur News : गेल्या दोन महिन्यांपासून ऊस लागवडीला शेतकरी प्राधान्य देत असल्याने रोपवाटिका चालकांकडून रोपे तयार करण्यासाठी उसाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. बियाणांबरोबर रोपांनाही मागणी वाढत असल्याने विशेष करुन पश्चिम महाराष्ट्राच्या ऊस पट्यातील उसाची बियाणांसाठी तोड होत असल्याचे चित्र आहे.
कांडी लागवडीबरोबर रोपांच्या निर्मितीसाठी ऊस प्लॉट तोडले जात आहेत. टनास ४००० ते प्रसंगी ५००० रुपयांपर्यंत दर देऊन बियाणांसाठी उसाची तोड होत असल्याने ऊस उत्पादकांनाही ते फायदेशीर होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील उसाचा दर्जा राज्यात चांगला असल्याने येथील बियाणाला व रोपांना राज्यभरातून चांगली मागणी असते. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात हजारो ऊस रोपवाटिकांचे जाळे आहे.
पूर्वी खासबेणे प्लॉटमधील उसाची तोड करुन उसाची लागण करण्यात येत होती. गेल्या १० ते १२ वर्षांत रोपवाटिकेतील तयार उसाची रोपे लावण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अन्य उसाचाही बियाणासाठी वापर होत आहे. या भागात ऊस रोपवाटिकाही अधिक आहेत. साखर कारखान्यांच्या समांतर यंत्रणा आता रोपवाटिकेची झालेली आहे.
रोपवाटिकेतून देशभरातील अनेक राज्यात रोपे पाठविली जातात. त्यामुळे वर्षभरातील साधारण आठ ते नऊ महिने उसाची तोड भरपूर प्रमाणात तर उर्वरित तीन-चार महिने थोड्या प्रमाणात होत असते. कारखाने चार-पाच महिने सुरू असले तरी रोपवाटिकेच्या उसाच्या तोडी वर्षभर सुरू असतात. ज्या गावात चांगल्या जमिनी व ऊस आहे त्या भागात बियाणांसाठी उसाची मोठ्या प्रमाणात तोड होते.
उसाच्या लागवडीला प्राधान्य
यंदा बहुतांशी ऊस पट्ट्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिले. परतीच्या पावसाबरोबर अवकाळी पाऊसही मोठ्या प्रमाणात झाला. यामुळे पाण्याच्या स्थानिक स्रोतांमध्येही चांगला साठा झाला. यंदाचा हंगाम सुरू झाल्यानंतर जसा ऊस तुटेल तसे शेतकऱ्यांनी तातडीने ऊस उत्पादकांनी पुन्हा ऊस लागवडीला प्राधान्य दिले. यामुळे अचानक ऊस बियाणांसह रोपांनाही मागणी वाढली. गेल्यावर्षी फारशी मागणी नसल्याने ऊस रोपवाटिका चालकांनीही रोपांची फारशी तजवीज केली नव्हती.
शेतकऱ्यांनाही फायदा
दोन महिन्यांपासून मागणीत वाढ झाल्याने रोपवाटिका चालकांनी अचानकपणे बियाणे प्लॉटच्या शोधाशोध सुरु केली. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सात ते दहा महिन्याचा ऊस आहे. अशा शेतकऱ्यांच्या उसाला अचानक चांगला भाव आला.
कारखाने ३००० ते ३१०० रुपये दर देत असताना रोपवाटिका चालकांनी मात्र ऊस जातीनुसार ४००० ते ५००० रुपये देऊ केल्याने शेतकऱ्यांनी रोपवाटिकेसाठी ऊस देण्यास प्रारंभ केला आहे. रोपवाटिका चालकांनीही कारखान्याच्या धर्तीवर स्थानिक ऊसतोडणी कामगारांच्या टोळ्या तयार केल्या आहेत.
या जातींना आहे मागणी
सध्या सर्वाधिक मागणी ८६०३२, ०२६५ या जातींना आहे. या खालोखाल १०००१, १५०१२, १३००७ या जातीच्या उसाला बियाणांसाठी मोठी मागणी आहे. सध्या थंडी कमी अधिक होत असल्याने कांडी लावण केल्यास त्याची उगवण होण्यास खूप वेळ लागतो. यापेक्षा रोपांची लागवड करुन वेळ वाचत असल्याने रोपांना अधिक मागणी असल्याचे सध्याचे चित्र आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.