चंद्रशेखर भडसावळे Environmental Sustainability: आजची उष्णतेची लाट ही निसर्गाची शिक्षा नसून इशारा आहे. पाऊस पडणे पुरेसे नाही; जमीन पाणी धरू शकली पाहिजे. झाडे लावणे पुरेसे नाही; ती जिवंत राहिली पाहिजेत. शेती करणे पुरेसे नाही; माती जिवंत ठेवली पाहिजे. यासाठी सगुणा रिजनरेटिव्ह तंत्र (एसआरटी) महत्त्वाचे ठरते..एप्रिल-मे महिन्यांत उष्णता असतेच, असे आपण अनेक वर्षे म्हणत आलो. पण आजची उष्णता केवळ उन्हाळा राहिलेली नाही; ती एक गंभीर पर्यावरणीय चेतावणी आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शेतात काम करणे कठीण व्हावे, ही सामान्य गोष्ट नाही. २५ ते ३० वर्षांपूर्वी दुपारी काही तास जाणवणारा उष्णतेचा त्रास आता पूर्ण दिवस व्यापू लागला आहे. ही बदललेली परिस्थिती केवळ तापमानवाढीची नाही, तर संपूर्ण जमीन कोरडी, गरम आणि निर्जीव होत चालल्याची खूण आहे..Maharashtra Weather Forecast : विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा.आज महाराष्ट्रासह अनेक भागांत उष्णतेची लाट आणि त्यासोबत कोरडे वातावरण हा महाभयंकर संगम तयार झाला आहे. यामागे जागतिक तापमान वाढ, औद्योगिकीकरण, शहरीकरण, जंगलतोड, जीवाश्म इंधनांचा वापर अशी मोठी कारणे आहेत. पण आपल्या डोळ्यांसमोर रोज घडणारी दोन स्थानिक कारणेही तितकीच गंभीर आहेत, ती म्हणजे जमिनीची सतत नांगरणी, वणवे आणि पीक अवशेष जाळणे..जमीन नांगरल्यामुळे मातीचा नैसर्गिक बांध तुटतो. जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होतो, गांडुळे आणि सूक्ष्मजीव नष्ट होतात, पाणी धरून ठेवण्याची क्षमता घटते आणि मातीची धूप वाढते. सुपीक माती स्पंजासारखी पाणी शोषून ठेवते; पण वारंवार नांगरलेली, रासायनिक खतांवर अवलंबून राहिलेली आणि उघडी पडलेली जमीन पावसाचे पाणी टिकवू शकत नाही. परिणामी, पावसाळ्यात पाणी वाहून जाते आणि उन्हाळ्यात तीच जमीन तव्याप्रमाणे तापते..दुसरे मोठे संकट म्हणजे वणवे. डोंगर उतार, माळराने आणि ओसाड भागांवरील सुकलेले गवत पेटवले, की काही क्षणांत शेकडो एकर जमीन जळते. जमिनीवरील नैसर्गिक आच्छादन नष्ट होते. झाडे, गवत, सूक्ष्मजीव, कीटक आणि पक्ष्यांचे अधिवास जळून खाक होतात. जंगल हे निसर्गाचे वातानुकूलन यंत्र आहे. झाडे सावली देतात, पाणी धरतात, वाऱ्याचा वेग कमी करतात आणि बाष्पोत्सर्जनाद्वारे वातावरण थंड ठेवतात. पण वणव्यांमुळे हे नैसर्गिक थंडावा देणारे यंत्र आपण नष्ट करत आहोत..Dharashiv Heatwave: सूर्य ओकतोय आग.शेतीतही पिकांचे अवशेष जाळण्याची पद्धत धोकादायक ठरत आहे. पुढील पेरणीसाठी शेत स्वच्छ व्हावे म्हणून काडीकचरा जाळला जातो. परंतु या जाळण्याने जमिनीचे मोठे नुकसान होते. जाळलेली जमीन काही दिवस स्वच्छ दिसते, पण प्रत्यक्षात तिचे अन्न, जीवसृष्टी आणि ओलावा नष्ट झालेला असतो. पृष्ठभागाचे तापमान वाढते, पाणी मुरण्याची क्षमता कमी होते आणि जमीन अधिक टणक व निर्जीव बनते. हे दुष्टचक्र वर्षानुवर्षे चालू राहिल्यास उत्पादकता घटते आणि शेतकरी अधिक रासायनिक खतांच्या चक्रात अडकतो..आजची उष्णता वेगळी का वाटते, याचे उत्तर याच प्रक्रियेत आहे. पूर्वी दुपारी उष्णता जाणवली तरी रात्री जमीन थंड होत असे. आता अनेक ठिकाणी रात्रीही उकाडा कमी होत नाही. कारण जमीन दिवसभर उष्णता साठवते आणि रात्री तीच उष्णता परत वातावरणात सोडते. उघडी माती, काँक्रीटची शहरे, कमी झालेले वृक्ष, कमी झालेली आर्द्रता आणि वाढलेले हरितगृह वायू यामुळे उष्णतेचे चटके अधिक तीव्र झाले आहेत..उपाययोजनाया संकटावर उपाय आहे, पण तो केवळ पाण्याच्या टँकरमध्ये किंवा एसीमध्ये नाही. उपाय जमिनीच्या उपचारात आहे. जमिनीला पुन्हा जिवंत करणे, हीच खरी हवामान-प्रतिबंधक कृती आहे. यासाठी नांगरणी थांबवणे, कायमस्वरूपी पिकांचे आच्छादन, पिकांचे अवशेष न जाळता जागेवर कुजवणे, वृक्षाधारित शेती, पाणलोट व्यवस्थापन आणि भूजल पुनर्भरण या गोष्टी आवश्यक आहेत..याच संदर्भात सगुणा रिजनरेटिव्ह तंत्र (एसआरटी) महत्त्वाचे ठरते. या पद्धतीत पिकांचे अवशेष जाळले जात नाहीत; ते जमिनीत किंवा जमिनीवर जागेवरच कुजवले जातात. त्यामुळे मातीचे सेंद्रिय कर्ब वाढते, ओलावा टिकतो, सूक्ष्मजीव वाढतात आणि जमीन वर्षातील मोठ्या काळात लागवडीखाली राहते. एसआरटी तंत्रामध्ये शेतकरी एका वर्षात तीन पिके घेऊ शकतो आणि सुमारे ३०० दिवस जमीन हिरव्या आच्छादनाखाली ठेवू शकतो. जंगल जसे वातावरण थंड ठेवते, तसेच हिरवे, आच्छादित आणि जिवंत शेत स्थानिक तापमान कमी करण्यात मदत करू शकते..परंतु या विषयात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. दोष फक्त शेतकऱ्यांचा नाही. शेतकरी आर्थिक दबाव, मजूरटंचाई, यांत्रिकीकरण, बाजारपेठेच्या अटी, धोरणे आणि उत्पादनवाढीच्या स्पर्धेमुळे काही पद्धती स्वीकारतो. म्हणून उपायही वैयक्तिक नव्हे तर सामूहिक हवा. शासन, संशोधन संस्था, ग्रामपंचायत, शेतकरी गट, शाळा, उद्योग आणि शहरातील नागरिक सर्वांनी जमीन पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घ्यायला हवा. .जमीन उघडी ठेवली, तर भविष्य अधिक तापेल. जमीन हिरवी ठेवली, तर आशा जिवंत राहील. भूमातेचा हा इशारा वेळेत ओळखला, तर उष्णतेच्या कहरातून मार्ग नक्कीच निघू शकतो.- चंद्रशेखर भडसावळे, ९८२२२८२६२३(लेखक मालेगाव-नेरळ,जि. रायगड येथील प्रयोगशील शेतकरी आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.