Heat Update : खानदेशात उष्णता वाढली

Summer Update : खानदेशात उष्णता दिवसागणिक वाढत आहे. कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत असून, शेतीकामांवर परिणाम होत आहे.
Summer Update
Summer UpdateAgrowon

Jalgaon News : खानदेशात उष्णता दिवसागणिक वाढत आहे. कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत असून, शेतीकामांवर परिणाम होत आहे. या आठवड्यात कमाल तापमानात सतत वाढ होत आहे. मंगळवारी (ता. १६) व बुधवारी (ता. १७) कमाल तापमान अनुक्रमे ४३ व ४४ अंश सेल्सिअसपर्यंत होते. उष्ण लाटेचा इशारा खानदेशात देण्यात आला होता. यातच ढगाळ वातावरणही आहे. रात्री उकाडा प्रचंड वाढला असून, शेतीकामे सकाळी १० पर्यंत उरकून घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.

मागील आठवड्यातील तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअसदरम्यान होते. परंतु या आठवड्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. शेतीकामाची वेळ बदलली असून, सकाळी सात ते १० किंवा ११ यादरम्यान शेतकरी कामे उरकून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मजूर उष्णतेत काम करण्यास नकार देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मजूरटंचाईचा अधिकचा सामना करावा लागत असून, कामे जादा मोबदला देऊन पूर्ण करून घ्यावी लागत आहेत.

Summer Update
Heat Wave : कोकणात उष्ण लाटेचा इशारा

पिकांना फटका

अतिउष्णतेचा फटका केळी, भाजीपाला पिकांना बसत आहे. कमाल तापमान काही दिवसांत किंवा पाच ते सहा दिवसांत ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने केळीच्या वाढीवर परिणाम होत आहे. लहान केळी बागांचे पोंगे पोळून पिवळे, लाल पडत आहेत. केळी बागांत घड निसटणे, झाडे कंबरेतून मोडून पडणे अशा समस्याही तयार झाल्या आहेत. बागांभोवती अनेकांनी हिरव्या नेट किंवा अन्य वारा अवरोधक लावले आहेत. उष्ण वारे बागांत शिरून मोठी हानी होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Summer Update
Maharashtra Rain : राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज; राज्यात उष्णतेची लाट आणि पावसाचेही वातावरण

कलिंगड पिकात कोवळी फळे पोळून पांढरी, पिवळी पडत आहेत. यामुळे फळे झाकण्यासाठी शेतकरी कागद, केळीची वाळलेली पाने अन्य सामग्री, आच्छादनाचा उपयोग करीत आहेत. केळीचे घड शेकले जाऊ नयेत यासाठी केळीच्या पानांचा चुडा त्यावर ठेवला जात आहे. तसेच अनेक शेतकरी क्रॉप कव्हर लावून घड झाकत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. तसेच अधिकचे श्रम घ्यावे लागत आहेत. पिकांचे सिंचनही काटेकोरपणे करून घ्यावे लागत असून, मध्येच वीजपुरवठा बंद झाल्यास किंवा रोहित्रात बिघाड झाल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनाच धावपळ करावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी यावर उपाय म्हणून ट्रॅक्टरचलित जनित्राची सोय करून घेतली आहे.

सध्या कांदा काढणी, मका कापणी, मळणीचे काम सुरू आहे. तसेच शेतातील कडब्याची कुट्टीही केली जात आहे. ही कुट्टी शेतातून घरी किंवा गावातील गोठ्यात आणण्याची कार्यवाही शेतकरी करीत आहेत. तसेच शेणखत वाहतूकही सुरू आहे. ही कामे रात्री किंवा सायंकाळी अनेक शेतकरी करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com