मयूरा बिजले Maharashtra Farming: एकीकडे शेतकऱ्यांना वेळेवर मजूर न मिळणे, दुसरीकडे मजुरांच्या हाताला काम न मिळणे, मजुरीचा दर आणि कामाच्या शोधात स्थलांतर होणे हे आपल्याकडचे मोठे प्रश्न आहेत. विशेषतः फलोत्पादन, फुलोत्पादन क्षेत्रात असणाऱ्या हंगामी कामावर याचा परिणाम जास्त प्रमाणावर दिसतो. या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न मुंबईतील अॅग्रीटेक स्टार्टअप भारत इंटेलिजन्सने केला आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील विविध फलोत्पादन मूल्यसाखळ्यांचा अभ्यास करताना अझान मर्चंट यांना मजुरांच्या प्रश्नाची तीव्रता लक्षात आली. अनेक वेळा यावर यांत्रिकीकरणाचा पर्याय पुढे येतो. मात्र हा पर्याय लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी खर्चिक आणि अव्यवहार्य ठरतो. .श्री. मर्चंट सांगतात, ‘‘शेतकऱ्यांच्याच नाही तर शेतमजुरांच्या देखील अडचणी खूप आहेत. त्यांना काम कोठे उपलब्ध आहे याची तत्काळ माहिती मिळत नाही, कामाच्या जागेवर जाण्यासाठी किफायतशीर वाहन उपलब्ध होत नाही, योग्य मजुरी मिळेल की नाही याची खात्री नाही. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी हे स्टार्टअप सुरू केले. शेतमजूर संकटाकडे केवळ रोजगाराचा प्रश्न म्हणून नव्हे, तर माहिती अर्थात डेटाच्या दृष्टिकोनातून पाहिले..डेटा आणि तंत्रज्ञान व स्थानिक परिस्थिती यांचा मेळ साधत एक सर्वसमावेशक उपाय समोर ठेवला. शेतकरी आणि शेतमजूर या दोघांचाही फायदा व्हावा, असा उद्देश होता. प्रत्येक शेतमजुरांच्या हाताला किमान ३०० दिवस हमखास काम मिळावे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून शेतमजूर व्यवस्थापनाचा नवा मार्ग शोधला. शेतकऱ्याकडे कोणते काम आहे, ते काम करणारा शेतमजूर कोणता, त्याच्याशी थेट संवाद, त्याला शेतकऱ्यापर्यंत आणणे, वाहन व्यवस्था पाहणे या साऱ्याचे व्यवस्थापन यातून केले जाते.’’.Agriculture Technology: फळबाग व्यवस्थापनातील स्वयंचलन.श्री. मर्चंट यांच्या या कल्पनेला तंत्रज्ञानाची साथ लागणार होती. त्यासाठी ते फेब्रुवारी २०२४ मध्ये बंगळूरमधील व्हेंचर कॅपिटल इनक्युबेटर अंतर्गत कार्यक्रमात सहभागी झाले आणि साधारण ५० संभाव्य सहसंस्थापकांशी त्यांनी संवाद साधला. येथे त्यांची भेट गौरव संघई यांच्याशी झाली. त्याच वर्षाच्या शेवटी दोघांनी मिळून भारत इंटेलिजन्सची स्थापना केली. यात श्री. मर्चंट सीईओ पदावर आहेत आणि गौरव संघई तांत्रिक जबाबदारी सांभाळतात. या स्टार्टअपला सप्टेंबर २०२५ मध्ये सह्याद्री फार्म्सच्या नेतृत्वाखाली सात कोटी रुपयांचे प्री-सीड निधी साह्य मिळाले..आजमितीला भारत इंटेलिजन्स नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसोबत काम करत आहे. या कंपनीची २२ जणांची टीम नाशिक, मुंबई आणि बंगळूर येथे आहे. राज्यभर विस्तार करण्याचा कंपनीचा प्रयत्न राहणार आहे. शेतकरी आणि शेतमजुरांनाही व्हॉट्सअॅप आणि फोन यांचा वापर करून संवाद साधणारे सोपे व हाताळायला सुलभ तंत्रज्ञान वापरले आहे. येथे चाललेल्या संवादाची एआय द्वारे माहिती घेतली जाते आणि गरजेनुसार कामाचे व्यवस्थापन केले जाते..ही प्रणाली राज्यातील प्रत्येक गावातील लोकसंख्या, रोजगार पद्धती, स्थलांतर, कौशल्ये यांसारख्या माहितीचे विश्लेषण करते. यावर आधारित त्या त्या गावाचे कामाचे कॅलेंडर तयार करून देते. शिवाय कोणत्या हंगामात कोणत्या प्रकारचे मजूर उपलब्ध असतील, त्यांची आवश्यकता काेठे आहे हे अचूकपणे ओळखते. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आणि शेतमजुरांचा पुरवठा यांचा मेळ घालणे शक्य होते.Agriculture Technology: शेतीमध्ये ‘इलेक्ट्रो कल्चर’ तंत्रज्ञानाचा वापर.कंपनी सुरुवातीला ही सेवा वापरण्यासाठी शेतकऱ्यांकडून नोंदणीसाठी काही ठरावीक रक्कम घेते आणि यातून शेतकऱ्यांसाठी शेतमजूर उपलब्ध करून दिले जातात. सध्या कंपनीकडे १,२०० शेतमजुरांची नोंद झाली असून आणखी ३,००० मजूर नाव नोंदणीच्या प्रतिक्षेत आहेत. यातून कंपनीने या वर्षात जास्तीत जास्त शेतकरी आणि शेतमजूरांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एकीकडे शेतीवर वातावरणातील बदल, रोग-किडींचा प्रादुर्भाव अशी वेगवेगळी संकटे येत असताना शेतीकामासाठी योग्य वेळी योग्य मजूर मिळणे खूप गरजेचे आहे..शिवाय एकीकडे कामाला हात नाहीत आणि दुसरीकडे हाताला काम नाही अशी परस्पर विरोधी परिस्थिती असताना ती तफावत तंत्रज्ञानाचा वापर करून भरून काढली जात आहे, हे या प्रयोगाचे यश. शेतमजूर टंचाईवर यांत्रिकीकरणाऐवजी मानवी श्रम, स्थानिक ज्ञान आणि एआय यांचा समन्वय साधणारा हा प्रयोग उल्लेखनीय आहे.(अधिक माहितीसाठी https://bharatintelligence.ai/) ९८८११२९२७९(मयूरा बिजले विकास पत्रकारितेच्या अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.