Fodder Shortage : चाराटंचाईचे वाढते संकट

Animal Fodder Issue : जंगलातील मानवनिर्मित वणव्यांमुळे जंगलाचा मोठा भाग जळून खाक झाला आहे. नवीन झुडपांसह चारा जळाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Animal Fodder
Animal FodderAgrowon

Mumbai News : पालघर जिल्ह्यात मार्च महिन्यात शेवटच्या आठवड्यापासून उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. असे असतानाच जंगलातील मानवनिर्मित वणव्यांमुळे जंगलाचा मोठा भाग जळून खाक झाला आहे. नवीन झुडपांसह चारा जळाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चाऱ्याअभावी आता जनावरांची उपासमार होणार आहे. चारा खरेदी करावा लागणार असल्याने पशुपालक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.

पालघर जिल्ह्यात दरवर्षी समाधानकारक पाऊस होतो; परंतु पालघरच्या पूर्वेकडील भाग डोंगराळ भाग असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा झटपट होऊन पाणी नदीमार्गे वाहून जाते. मार्च महिन्याच्या सुरुवातीला जव्हार, मोखाडा भागात पाणी टंचाई जाणवू लागते. त्यातच मार्च महिन्यापासून जंगलात लागलेल्या मानवनिर्मित वणव्यांमुळे जंगलाचा मोठा भाग जळून गेला आहे.

Animal Fodder
Fodder Shortage Condition : दुष्काळ आणि चाराटंचाईचे भीषण वास्तव

वणव्यांमध्ये जंगलातील चारा जळाल्याने ग्रामीण भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चारा उपलब्ध होत नसल्याने पशुधन सांभाळणे अवघड होत आहे. महागडा चारा खरेदी करावा लागत असूनही चारा उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पशुधन बाळगणे बंद केले आहे. अशात चारा उपलब्ध नसल्याने पशुधन सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

ग्रामीण भागात आदिवासी शेतकरी पशुधन बाळगून आहेत. आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी जंगल क्षेत्रात असल्याने जमिनीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर करता येत नसल्याने पशुधन सांभाळणे गरजेचे ठरते. त्यामुळे पाळीव जनावरांना चरण्यासाठी जंगलात सोडले जाते. भूमिहीन शेतकऱ्यांनी जंगलात शेती सुरू केल्याने चराऊ क्षेत्र कमी झाले. वणव्यांमुळे चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला.

Animal Fodder
Fodder Shortage : साकुर्डे येथे जनावरांसाठी चाऱ्याचे वाटप

बंधाऱ्यांमध्ये गाळ

सूर्या प्रकल्पांतर्गत पालघर तालुक्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे धरणाचे पाणी येथे पोहोचू शकले नाही. चांगले पर्जन्यमान असल्याने रब्बीत शेतीला काही प्रमाणात पाणी उपलब्ध होते. परंतु, उन्हाळ्यात तालुक्यातील पूर्वेकडील काही गावांत मार्चपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. पावसाचे पाणी अडवण्यासाठी डोंगरातील नाल्यांवर छोटे-मोठे बंधारे बांधले आहेत. मात्र, बंधाऱ्यांमध्ये गाळ साचल्याने जास्त काळ पाणी साठून राहत नाही. परिणामी, जानेवारी-फेब्रुवारीच्या अखेरीस बंधारे कोरडे पडतात.

पालघर जिल्ह्यात तीन लाख आठ हजार ६३७ पशुधन आहेत. पावसाळी पर्जन्यमानानुसार जिल्ह्यात पाणी टंचाई नाही. शेतकऱ्यांनी चाऱ्याचे नियोजन केले पाहिजे. शेतकऱ्यांची मागणी आल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार चारा उपलब्ध केला जाईल.
डॉ. प्रकाश हसनाळकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com