Sangli News : राज्यातील द्राक्ष हंगाम ७० टक्के आटोपला आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात देशांतर्गत आणि निर्यातक्षम द्राक्षाच्या दरात प्रति किलोस ८ ते १० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या द्राक्षाला प्रति किलोस ४० रुपये ५० रुपये असा दर मिळत आहे.
हंगामाच्या अंतिम टप्प्यात द्राक्षाचे दर वाढल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिसाला मिळाला आहे. द्राक्षाची मागणी वाढत असल्याने दरात वाढ होईल, असा अंदाज द्राक्ष उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
राज्यात द्राक्षाचे क्षेत्र साडेचार लाख इतके आहे. यंदाचा हंगाम धरण्यापासून अपुरा पाऊस झाला. त्यातच शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. त्यातूनही शेतकऱ्यांनी फळ छाटणीचे नियोजन केले. फळ छाटणी विभागून झाली. प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा साधल्या.
सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने रोगाचाही प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे फळ छाटणीपासून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साहाचे वातावरण नव्हते. त्यातूनही शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत द्राक्ष बागा साधल्या. राज्यात आगाप फळ छाटणी सुमारे ५० हजार एकरांवरील द्राक्षाची विक्री जानेवारी महिन्यातच पूर्ण झाली होती.
मात्र डिसेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे द्राक्षाचे नुकसान झाले. सध्या उत्तर भारतात थंडी वाढल्याने उत्तर भारतातून द्राक्षाची मागणी कमी झाली असल्याचे चित्र आहे. त्यातच गेल्या महिन्याभरात कधी ढगाळ वातावरण, थंडी याचा फटका बागेला बसला आहे.
परिणामी, द्राक्षात गोडी उतरली नाही. रंग, आकार वाढला नाही. त्यामुळे याचा परिमाण द्राक्षाच्या दरावर झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला नसल्याने आर्थिक ताळमेळ लावणे मुश्कील बनले होते.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात द्राक्ष बागेस पोषक वातावरण मिळाल्याने द्राक्षाची गोडी, रंग आणि जाडी वाढली. त्यातच उत्तर भारतातील थंडीही कमी झाल्याने द्राक्षाचा उठाव होऊ लागला. त्यामुळे यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच प्रति किलोस ४ ते ५ रुपयांची वाढ झाली.
त्यानंतर देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षाची मागणी वाढली. द्राक्षाचा उठावही चांगला होऊ लागला आहे. बाजारात दर्जेदार द्राक्ष पोहोचू लागल्याने द्राक्षाच्या दरात प्रति किलोस ८ ते १० रुपयांनी दर वाढ झाली आहे.
सध्या राज्यातील सांगली, पुणे, आणि नाशिक या द्राक्ष विभागात अनुक्रमे २० टक्के, तर सोलापूर विभागात ५० टक्के द्राक्षाची काढणी अजून बाकी आहे. त्यामुळे सोलापूर वगळता इतर विभागातील एप्रिलअखेर हंगाम संपेल. तर सोलापूर विभागाचा हंगाम मेअखेर पूर्ण होईल. येत्या काळात द्राक्षाच्या दरात वाढ होण्याची शक्यताही द्राक्ष उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.
निर्यातक्षम द्राक्ष दरात ८ ते १० रुपये वाढ
देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षाचे दर वाढल्याने याचा फायदा निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनाही झाला आहे. निर्यातक्षम द्राक्षाच्या दरातही ८ ते १० रुपयांनी दर वाढले आहेत. निर्यातक्षम द्राक्षाला प्रति किलोस ५५ ते ८० रुपये असा दर मिळत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.