

श्रीमती कविता मुंदणकर
द्राक्षाला केवळ चविष्ठ, पोषणमूल्ययुक्त फळ म्हणूनच नाही, तर त्यापासून तयार होणाऱ्या विविध आरोग्यवर्धक आणि औद्योगिक उत्पादनांमुळेही त्याचे महत्त्व आहे. प्राचीन काळापासून द्राक्षांचा उपयोग अन्न, पेय, आणि औषधनिर्मितीमध्ये केला जात आहे. आहारात द्राक्षाचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. रेड आणि ब्लॅक द्राक्षांमध्ये असणारा रेसव्हेराट्रॉल (Resveratrol) हा घटक हृदयविकाराच्या प्रतिबंधासाठी उपयोगी ठरतो.
जागतिक स्तरावर भारत हा द्राक्ष उत्पादनात अग्रणी देशांपैकी एक आहे. राज्यातील नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर यांसारख्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादन होते. सध्या भारत युरोप, अमेरिका, मध्य पूर्व, आणि आग्नेय आशियातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर ताज्या द्राक्षांची निर्यात करतो. मात्र, द्राक्षावरील प्रक्रिया व त्या उद्योगात तयार होणाऱ्या टाकाऊ पदार्थांच्या वापराकडे तुलनेने फारच कमी लक्ष दिले जाते.
द्राक्ष प्रक्रिया उद्योगातून बी, साल आणि द्राक्षांच्या रसाची अवशिष्टे (pomace) मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. त्याच्या विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नसल्यामुळे पर्यारणीय समस्या निर्माण होऊ शकतात. खरेतर या टाकाऊ पदार्थांमध्येही अँटिऑक्सिडंट्स, फायटोकेमिकल्स, आणि फायबर्स भरपूर असतात. त्याचा वापर औषधनिर्मिती, पशुखाद्य, सौंदर्यप्रसाधने आणि सेंद्रिय खत निर्मितीसाठी होऊ शकतो. त्यातून त्या उद्योजकाला उत्पन्नाचे आणखी एक साधन तयार होईल. कदाचित द्राक्ष उत्पादकांनाही अधिक दर देणे त्यांना शक्य होईल.
पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये उत्पादन आणि प्रक्रियेतील टिकाऊ तंत्रज्ञान आणि नवकल्पना विकसनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यांनी प्रक्रियेदरम्यान शिल्लक राहणाऱ्या टाकाऊ पदार्थांपासून उच्च मूल्ये असलेली उत्पादने विकसित केली आहेत. ती पोषण, औषध म्हणून उपयोगी आहेत.
उदा. लीसपासून पोषणमूल्ययुक्त दही, द्राक्ष मण्याच्या सालीतील अँथोसायनिन्स अर्क नैसर्गिक अन्नरंग आणि औषधी उपयोगासाठी, पिंक मिलीबग नियंत्रणासाठी फेरोमोन-आधारित जैविक उपाय, द्राक्ष पोमेसपासून फायबरयुक्त, कच्च्या द्राक्षांपासून तयार केलेला अर्क (Verjuice) आणि अँटिऑक्सिडंट्सयुक्त कुकीज यांसारखी उत्पादने संशोधन केंद्राच्या संशोधनातून विकसित झाली आहेत. या तंत्रज्ञानामुळे द्राक्ष प्रक्रिया उद्योग अधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरक होत आहे.
भाकृअनुप-राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने (ICAR-NRCG) द्राक्ष शेतकऱ्यांना व्यवस्थापनाचे निर्णय घेणे सोपे करण्यासाठी ‘डिसिजन सपोर्ट सिस्टीम (DSS)’ विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे मातीचे पोषणस्तर, हवामान, आणि द्राक्षवेलींच्या वाढीवर आधारित पाणी व्यवस्थापनाच्या शिफारसी दिल्या जातात. शेतीच्या तण, कीड आणि रोग नियंत्रण व्यवस्थापनासह पाणी वापर कार्यक्षमता वाढविण्यासाठी डीएसएस उपयुक्त ठरते.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने विकसित केलेल्या तंत्रज्ञानांतून नव्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत आहेत. या तंत्रज्ञानांवर आधारित नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या इच्छा असल्यास केंद्राशी संपर्क साधता येईल. केंद्राद्वारे तंत्रज्ञान हस्तांतरण, प्रशिक्षण आणि स्टार्टअपसाठी सहकार्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
श्रीमती कविता मुंदणकर, ०८३२९३४७३१७
०२०-२६९५६००० / २६९५६००१
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.