Wada News : पालघर जिल्ह्यात पाणीप्रश्न पेटला असून पाणीपुरवठा विभागातील शाखा आणि कनिष्ठ अभियंता सामूहिक रजेवर गेले असतानाच आता अनेक ग्रामसेवकही सामूहिक रजेवर गेल्याने गावकारभार ठप्प पडला आहे. त्यामुळे श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाचा धसका प्रशासनाने घेतल्याचे दिसून येते.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत जिल्हाभरामध्ये नळ पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत, मात्र ती पूर्ण झाली नाहीत. या योजनांची इत्थंभूत माहिती पाणीपुरवठा विभागाकडे आहे. या योजनेची देयके जिल्हास्तरावरून अदा केली असून ग्रामपंचायत अथवा ग्राम पाणीपुरवठा समिती यांना न विचारता देयके अदा केली आहेत.
शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता सामूहिक रजेवर गेल्याने ग्रामपंचायतस्तरावर योजनेची तांत्रिक माहिती देणे शक्य होत नाही. अभियंते आंदोलनस्थळी येत नाहीत, तोपर्यंत ग्रामसेवकांना रात्री उशिरापर्यंत आंदोलनकर्त्यांकडून थांबवून ठेवले जाते. त्यामुळे ग्रामसेवक मानसिक तणावात असून अभियंते कामावर हजर होत नाहीत, तोपर्यंत ग्रामसेवक सामूहिक रजेवर गेले आहेत.
डहाणू गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
डहाणू तालुक्यातील पाणी पुरवठ्याची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. या योजनांच्या कामाचा जाब विचारण्यासाठी श्रमजीवी संघटना आंदोलन करत आहे. पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंते सामूहिक रजेवर गेले आहेत. ते आंदोलनस्थळी येत नाहीत, तोपर्यंत संबंधित ग्रामसेवकाला रात्री उशिरापर्यंत नाहक थांबून ठेवतात, असा आरोप डहाणू गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ग्रामसेवकांच्या संघटनेने केला आहे. या वेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष मोहन पासलकर आणि नीलेश जाधव उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.