
Mumbai News : राज्यात वन्यप्राणी आणि शेतकऱ्यांचा संघर्षात नुकसान होत आहे. तसेच शेतीच्या नुकसानीबाबत आढावा घेऊन मिळणाऱ्या भरपाईत सुधारणा करण्याची गरज असेल तर ती केली जाईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी (ता.१४) मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली.
तसेच राज्यात वाढत्या बिबट्यांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी नसबंदीचा प्रस्ताव पुन्हा केंद्र सरकारला पाठवू असेही ते म्हणाले. राज्यात विविध ठिकाणी झालेल्या वाघांच्या शिकारी आणि मृत्यूबाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
शेतकरी आणि वन्यप्राण्यांच्या संघर्षाबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना नाईक म्हणाले, ‘‘बफर झोनमध्ये वाघ अथवा वन्य प्राण्याने हल्ला केल्यास वन विभाग जबाबदार राहत नाही. मात्र शेतीचे मोठे नुकसान होत आहे. अशा वेळी मिळणारी भरपाई कमी असेल तर त्याबाबत सुधारणा करण्यात येतील. तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांप्रती नेत्यांसारखीच भावना ठेवून पंचनाम्याची कार्यवाही केली पाहिजे,’’ असेही ते म्हणाले.
वन्य प्राण्यांच्या मानवी वस्तीतील वावराबाबत ते म्हणाले, की ब्रिटिशांनी वृक्ष लागवड करताना अनेक बाबींचा विचार केला. तो विचार पुन्हा अमलात आणण्याची गरज मी अधिकाऱ्यांना बोलून दाखवली आहे. वनांमध्ये वनभाज्या आणि फळे मुबलक प्रमाणात मिळाली तर त्यावर जगणारे प्राणी वाढतील आणि शिकारी प्राणी जंगलात राहतील. यासाठी केवळ झाडे लावायची म्हणून लावू नका तर फळझाडे लावण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. जेणेकरून त्या झाडांची फळे खाण्यासाठी ससे, मुंगूस, चितळ, रानगायी अशा शाकाहारी प्राण्यांच्या खाद्याची व्यवस्था होईल आणि त्यामुळे शिकारी प्राणी बफर झोनच्या बाहेर येणार नाहीत.
‘नसबंदीचा प्रस्ताव केंद्राला पाठवू’
विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी चार दिवसांपूर्वी बिबट्यांच्या नसबंदीबाबत पत्र दिल्याचे सांगून नाईक म्हणाले, की नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागते. सध्या राज्यात बिबट्यांची मोठी संख्या वाढली आहे. जुन्नर आणि आंबेगाव परिसरांत गेल्या १५ ते २० वर्षांत मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाल्याने ऊस तोडल्यानंतर त्यांचा अधिवास संपतो आणि ते मानवी वस्तीत जातात. त्यामुळे बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी नसबंदी हा एक उपाय आहे. त्यासाठी गरज पडल्यास केंद्रीय मंत्र्यांशी चर्चाही करू.
२०२३-२४ वर्षात १३ वाघांचा मृत्यू
२०२३-२४ या वर्षात १३ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. काही ठिकाणी डुकरांची शिकार करण्यासाठी लावलेल्या सापळ्यात वाघ अडकले आहेत. आपले क्षेत्र पक्के करण्यासाठी झालेल्या झुंजीमध्ये काही वाघांचा मृत्यू झाला आहे. नागपूरच्या प्राणिसंग्रहालयात बीफऐवजी कोंबडीचे मांस दिले. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने वाघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कोंबडीचे मटण का दिले गेले याला जबाबदार कोण याची चौकशी होईल. कुणाला त्रास होईल यासाठी कारवाई होणार नाही, असेही ते म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.