
Pune News: केंद्र सरकारने बायोस्टिम्युलंट हे कायद्याच्या कक्षेत आणले आहे. हे जैविक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन धोरण विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आणि जैव उत्तेजकांचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत. येत्या काळात जैव उत्तेजक उत्पादकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्यावर केंद्र शासनाकडून भर दिला जात असल्याची माहिती राष्ट्रीय जैव उत्तेजक उत्पादक समितीचे सल्लागार डॉ. ए. के. सक्सेना यांनी दिली.
‘एम’ अर्थात अॅग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ इंडियाने निविष्ठा उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘एम बीटूबी कॉन्क्लेव्ह २०२५’ या परिषदेचे पुण्यातील कोरेगाव पार्क येथे सोमवारी (ता. ३) उद्घाटन श्री. सक्सेना यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी कृषी शास्त्रज्ञ डॉ. प्राजिब चक्रवर्ती, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. हरिहर कौसडीकर, ‘एम’चे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील, ‘एनआरसी’चे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी, सचिव समीर पाथरे आदी उपस्थित होते.
श्री. सक्सेना म्हणाले, की भारत सरकारने १९८५ च्या खत नियंत्रण आदेशाच्या सहावी अनुसूचित जैवउत्तेजकांचा समावेश केला आहे. त्यानंतर मार्गदर्शक सूचना २३ फेब्रुवारी २०२१ रोजी एस.ओ. ८८२ (ई) नुसार अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केल्या आहेत. शासनाकडून कारवाईसाठी अधिसूचना जारी केल्या जात असताना बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर उत्पादने उपलब्ध दाखल झाली होती. परंतु त्याची माहितीचे संकलन आणि त्याचे प्रमाण यांच्या चाचण्या तयार करण्यासाठी मोठा कालावधी लागला. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात नोंदणीची संकल्पना देखील उपरोक्त अधिसूचनेत ठेवली आहे.
कृषी शास्त्रज्ञ डॉ. प्राजिब चक्रवर्ती म्हणाले, की देशात अनेक राष्ट्रीय जैव उत्तेजक उत्पादकांचे ब्रॅण्ड मार्केटमध्ये येत आहे. परंतु त्यामध्ये काही उत्पादनांमध्ये कीड नाशकाचे अवशेष आढळल्याच्या समस्या पुढे आल्या आहेत. त्यामुळे याला कायद्यानुसार कीडनाशक व जैविक खताशिवाय वेगळे स्थान देण्यात आले आहे. या सर्वांचा वापर करताना शुद्धता तपासणी गरजेची आहे. विविध उत्पादके बाजारात नित्कृष्ठ दर्जाचे जैव उत्तेजके पुरवठा करत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी जागृत राहून उत्कृष्ट दर्जाच्या जैव उत्तेजकांचा वापर करावा.
डॉ. हरिहर कौसडीकर म्हणाले, की शाश्वत आणि दर्जेदार उत्पादनासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी मातीचे आरोग्य आणि संतुलित पीक पोषण यावर भर देणे गरजेचे आहे. आजच्या बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत तसेच जैविक ताण आणि दर्जेदार उत्पादन यासाठी संतुलित पोषण हा महत्त्वाचा पर्याय दिसून येत आहे. याकरिता माती हेच मुख्य माध्यम असून शेती व्यवसायाचे भांडवल आहे. मातीला सशक्त आणि समृद्ध करणे काळाची गरज आहे. तथापि कृषी निविष्ठाच्या दर्जेदार वापरासाठी आणि त्या निविष्ठांपासून विविध पिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्यासाठी जमीन ही आरोग्यदायी असणे गरजेचे आहे.
डॉ. कौशिक बॅनर्जी म्हणाले, की, काही जैव उत्तेजकांचे महत्त्व सर्वच पिकांमध्ये आवश्यक आहे. त्यामुळे द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये त्याचे पृथक्करण केले जात आहे. तसेच विविध जैव उत्तेजकांच्या चाचण्या देखील घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये फळ उत्पादकांच्या दृष्टीने जैव उत्तेजके फायदेशीर असल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये वनस्पतीची शरीरक्रिया शास्त्र नियमित व संतुलित करण्याची क्षमता आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव समीर पाथरे यांनी केले. तर ‘एम’चे उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे यांनी आभार मानले.
मातीला समृद्ध करणे गरजेचे : डॉ. कौसडीकर
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. हरिहर कौसडीकर म्हणाले, की शाश्वत आणि दर्जेदार उत्पादनासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी मातीचे आरोग्य आणि संतुलित पीक पोषण यावर भर देणे गरजेचे आहे. आजच्या बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत तसेच जैविक ताण आणि दर्जेदार उत्पादन यासाठी संतुलित पोषण हा महत्त्वाचा पर्याय दिसून येत आहे. याकरिता माती हेच मुख्य माध्यम असून शेती व्यवसायाचे भांडवल आहे. मातीला सशक्त आणि समृद्ध करणे काळाची गरज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.