
Pune News : अहमदनगर जिल्ह्यात एकीकडे दुष्काळामुळे उभी पिके जळत असतानाच भंडारदरा धरणाच्या पाण्यावरून राजकारण तापले आहे. यावरून माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. तसेच विखे-पाटील यांचा कारभार 'तुघलकी' असून येथील स्थानिक आमदार लहू कानडे बेजबाबदार लोकप्रतिनिधी असल्याचा घणाघात मुरकुटे यांनी केला आहे. तसेच भंडारदरा धरण लाभक्षेत्रातील उन्हाळ्यातील पाटपाण्याचे व्यवस्थापन योग्य झाले नाही. यामुळेच श्रीरामपूर भागाला पुरेसे पाणी मिळालेले नाही. याला फक्त विखे पाटील यांचा 'तुघलकी' कारभार जाबाबदार असल्याच मुरकुटे म्हणाले.
श्रीरामपूर भागाला पाणी देण्यासाठी अनेक वेळा पाटबंधारे विभागाशी संपर्क केला. मात्र भंडारदरा धरणाचे उन्हाळी आवर्तनाचा खेळखंडोबा विखे पाटील यांनी केला. त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून श्रीरामपूर भागातील शेतकऱ्यांच्या ऊसाला पाणी दिले नाही. त्यामुळेच उभी पिके उद्ध्वस्त झाल्याचा आरोप मुरकुटे यांनी केला. तर हा अन्यायकारक प्रकार तत्काळ पाटबंधारे विभागासह विखे-पाटील यांनी थांबवावेत असा इशारा मुरकुटे यांनी दिला आहे.
कारखाना बंद पाडण्याचा डाव
श्रीरामपूर परिसरातील अशोक कारखान्याच्या परिसरावर अन्याय करून विखे पाटील यांच्या प्रवरा परिसराच्या कार्यक्षेत्राला दोनदा पाणी दिले गेले. यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उन्हाच्या झळा आणि पाणी नसल्याने जळाला. यामागे विखे यांचा कारखाना बंद पाडण्याचा डाव असल्याचा, आरोप देखील मुरकुटे यांनी केला आहे.
पाणी सोडले मात्र...
दरम्यान भंडारदरा धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाणी वाटपावरून मुरकुटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दादा भुसे यांची मुंबईत भेट घेऊन तक्रार केली होती. यानंतर पाटबंधारे विभागाने पाणी सोडले होते. मात्र विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणून पाण्याचा दबाव कमी केला. ज्यामुळे श्रीरामपूर परिसरातील बहुतांशी शेतकऱ्याला पाणी मिळालेच नाही.
आमदार गप्प पण बंधूंची लुडबुड
एकीकडे श्रीरामपूर तालुक्यावर अन्याय होत असतानाही तालुक्याचे महाशय आमदार एक शब्द बोलायला तयार नाहीत, अशी टीका आमदार लहू कानडे यांचे नाव न घेता केली आहे. तसेच लोकप्रतिनिधी हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दक्ष असावे लागते. मात्र आमच्या आमदारांचे शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष नाही. त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप मुरकुटे यांनी कानडे यांच्यावर केला आहे. तसेच आमदार गप्प पण बंधूंची लुडबुड अधिक असल्याचा टोला लगावला आहे. तर कानडे यांचे बंधू सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सूचना करतात असाही आरोप मुरकुटे यांनी केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.