Pune News : यंदा देशातील पाच मान्यवरांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यातील माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, पीव्ही नरसिंह राव, माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचा मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्काराने शनिवारी (ता.३०) सन्मान करण्यात आला. तर माजी उपपंतप्रधान भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा रविवारी (ता. ३१) 'भारतरत्न' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अडवाणी यांच्या घरी जाऊन दिला. यावेळी उपराष्ट्रपती जगदीश धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह राजनाथ सिंह उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांनी अडवाणी यांचं अभिनंदन केलं.
दरम्यान शनिवारी (ता. ३०) पार पडलेल्या राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात नरसिंह राव यांचे पुत्र पीव्ही प्रभाकर राव, चौधरी चरण सिंह यांचे नातू जयंत चौधरी, कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र रामनाथ ठाकूर आणि एमएस स्वामीनाथन यांची कन्या नित्या राव यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून भारतरत्न पुरस्कार स्वीकारला. पण अडवाणी यांची सध्या प्रकृती अस्वस्थ असल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते.
अडवाणींनी भारतरत्न पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर फेब्रुवारीत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. अडवाणी म्हणाले होते, 'अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने मी 'भारतरत्न' स्वीकारतो, जो आज मला प्रदान करण्यात आला आहे. हा केवळ एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठी सन्मान नाही, तर मी आयुष्यभर माझ्या क्षमतेनुसार सेवा केलेल्या आदर्श आणि तत्त्वांचाही सन्मान आहे.’’
तर अडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा करताना ३ फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मोदींनी, "अडवाणी आमच्या काळातील सर्वात प्रसिद्ध राजकारण्यांपैकी एक आहेत. त्यांचे भारताच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. अडवाणी यांच्या जीवनाची सुरुवात तळागाळातून झाली आणि ते उपपंतप्रधान पदापर्यंत पोहचले. त्यांनी देशाची सेवा केली, असे मोदी यांनी म्हटले होते.
आडवाणी यांचे थोडक्यात कार्य
आडवाणी यांनी अयोध्येत श्रीराम मंदिराच्या स्थापनेसाठी योगदान दिले. त्यांनी रथयात्रा काढत देशात श्रीराम मंदिराच्या स्थापनेसाठी वातावरण तयार केले होते. तसेच अडवानी यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून भूमीका बजावली होती. तर २०१५ साली आडवाणी यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
भारतरत्न मिळविणाऱ्यांची संख्या
यंदा पहिल्यांदाच एका वेळी पाच जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. यात माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, पीव्ही नरसिंह राव, माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार देण्यात आला. तर आडवाणी यांना भारतरत्न देण्यात आला आहे. आतापर्यंत देशात ५३ जणांचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.