Latur News : जिल्ह्यातील काही भागात सोमवारी (ता. २२) दुपारनंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे फळ बागा, पिकांसह खासकरून आंब्याचे मोठे नुकसान केले. लातूर जिल्ह्यातील येरोळ, जळकोट, देवणी, निटूर, निलंगा परिसरात जोरदार वादळी पाऊस झाला.
दवणहिप्परगा, तळेगाव, गुरनाळ, बोंबळी (खुर्द), बोंबळी ( बु ) यासह अनेक गावात अखंड हरिनाम सप्ताह धार्मिक कार्यक्रमासाठी टाकण्यात आलेले टेन्टचे मोठे नुकसान झाले. याशिवाय वलांडी, धनेगाव, बोंबळी, कवठाळा भागांत अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले.
त्यामुळे संसार उपयोगी साहित्य भिजल्याने मोठे नुकसान झाले. या शिवाय, काढणीला आलेली ज्वारी, कडबा, सोयाबीनची गुळी भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. टरबूज, पपई, केळी, आंबा या बागांना मोठा फटका बसला. कवठाळा, कोरेवाडी भागात अंतिम टप्प्यातील गुराळे पावसामुळे (Rain) बंद करावी लागली. गूळ घरावरील पत्रे उडाल्याने गूळ भिजल्याने शेतकऱ्यांना फटका बसला.
निलंगा तालुक्यात गेल्या कांही दिवसापासून अवकाळी चांगलाच दणका दिला आहे. सोमवारी वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तालुक्यातील उस्तूरी, कासार बालकुंदा, कासारशिरसी, हासोरी या भागात गारपीट झाली.
त्यामुळे शेतीचे नुकसान झाले. आंब्यासह ज्वारी, गहू पिकांचे अतोनात नुकसान झाले. निलंगा तालुक्यातील बोरसुरीतील मजुराचा वीज पडून मृत्यू झाला. मुस्तफा शफीर पठाण, (वय ३४) असे त्यांचे नाव आहे. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन लहान मुली असा परिवार आहे.
नुकसानीने गावरान आंबा हिरावला
जळकोट तालुक्यात आंब्यांच्या कैप्याचे मोठे नुकसान झाले. विद्युत प्रवाह गेल्याने नागरिकांची गैरसोय झाली. आंब्याच्या झाडांखाली कैप्यांचा सडाका पडत आहे. त्यामुळे अक्षयतृतेला गावरान अंबा खायला मिळणे अवघड झाले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.