
Agricultural Tips :
शेतकरी नियोजन
पीक : संत्रा
शेतकरी : प्रफुल्ल विष्णुपंत टिंगणे
गाव : काजळी, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती
संत्रा क्षेत्र : सात एकर
एकूण झाडे : १००० झाडे
अमरावती जिल्ह्यातील काजळी येथील अनेक शेतकरी शास्त्रोक्त पद्धतीने संत्रा पिकाच्या व्यवस्थापनावर भर देत आहेत. बागेस पुरेसा सूर्यप्रकाश मिळण्यासाठी वेळेवर छाटणी, बहर व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण संत्रा फळांचे उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. येथील प्रफुल्ल विष्णुपंत टिंगणे यांची ८ एकर शेती आहे.
त्यापैकी ७ एकरांवर संत्र्याची सुमारे १ हजार झाडे आहेत. सात एकरांतील संत्रा लागवडीत एका बागेत ५०० झाडे १८ वर्षे वयाची, तर उर्वरित ५०० झाडे १४ वर्षे वयाची आहेत. बागेतील सर्व झाडांना चोहोबाजूंनी पुरेसा सूर्यप्रकाश मिळावा, यासाठी फांद्या छाटणीवर भर दिला जातो. यामुळे फळांच्या गुणात्मक दर्जात सुधारणा होते, असा प्रफुल्ल टिंगणे अनुभव आहे.
आंबिया बहर व्यवस्थापन
संत्रा बागेत आंबिया बहर धरण्यासाठी डिसेंबर महिन्यात बाग ताणावर सोडली. ताण कालावधीत झाडांची सल काढणी केली. त्यानंतर चांगले कुजलेले शेणखत झाडांना दिले.
वाळलेल्या फांद्या (सल) काढताना झाडांना झालेल्या जखमांमधून बुरशीजन्य रोगांचा शिरकाव होण्याची शक्यता असते. त्याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून बोर्डोची फवारणी घेतली.
साधारणपणे दहा जानेवारीच्या दरम्यान बागेचा ताण तोडला जाईल. बागेचा ताण तोडण्यापूर्वी एक किलो निंबोळी ढेप व १०ः२६ः२६ यांच्या प्रति झाड मात्रा दिल्या जातील.
कीड-रोग व्यवस्थापन
फेब्रुवारीत फुलधारणा होऊन मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून लहान आकाराची फळे झाडावर दिसू लागतात. या काळात मावा, तुडतुडे व इतर किडींचा प्रादुर्भाव दिसून येण्यास सुरुवात होते. योग्यवेळी नियंत्रणाचे उपाय न केल्यास फळांचा दर्जा खालावतो. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शिफारशीत रासायनिक घटकांची फवारणी घेतली जाते. पावसाळ्याच्या दिवसांत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागतो.
या काळातही खबरदारी म्हणून शिफारशीत बुरशीनाशकांची फवारणी घेतली जाते. जून महिन्यात स्युडोमोनास आणि ट्रायकोडर्मा यांचा आळवणीद्वारे वापर केला जातो. बहर धरल्यापासून फळे तुटून जाईपर्यंत योग्य व्यवस्थापन केल्यामुळे दर्जेदार फळांचे उत्पादन मिळण्यास मदत होत असल्याचे प्रफुल्ल टिंगने सांगतात.
सिंचन व्यवस्थापन
सात एकर क्षेत्रावरील पिकांना सिंचन करण्यासाठी सुरुवातीला विहिरीचा पर्याय होता. परंतु विहिरीतील पाणी बागेला पुरत नव्हते. म्हणून बोअरवेल घेतली. त्यास मुबलक पाणी लागले. परिसरातील शेतकऱ्यांचा पाटपाणी देण्यावर भर अधिक होता. मात्र, प्रफुल्ल यांनी सुरुवातीपासूनच ठिबकद्वारे सिंचन करण्यावर भर दिला.
सुरुवातीच्या काळात बागेतील ठिबकच्या नळ्या उंदीर आणि तत्सम प्राण्यांकडून कुरतडण्यात आल्या. त्यामुळे नाइलाजाने ठिबक काढून त्याजागी पाटपाणी देण्याचा निर्णय घ्यावा लागला. बागेच्या गरजेनुसार सिंचन करण्यावर भर दिला जातो. झाडापासून चार ते पाच फूट अंतरावर सरी काढून त्यातूनच सिंचन केले जाते. त्यामुळे पाण्यापासून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळविणे शक्य होते, असा त्यांचा अनुभव आहे.
प्रफुल्ल टिंगने, ९५१८७९१३४३
(शब्दांकन : विनोद इंगोले)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.