.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Kolhapur News : सततच्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्याला विविध नद्यांच्या महापुराचा विळखा पडला आहे. जिल्ह्यात पाऊस सुरूच असून जिल्ह्यातील महत्त्वाच्या असणाऱ्या राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडल्याने आता भोगावतीसह पंचगंगा व अन्य नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पंचगंगा नदीचे पाणीही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. दुपारी तीन वाजता पाण्याची पातळी ४३.३ फूट होती. चिखली, आंबेवाडी येथे ‘एनडीआरएफ’च्या पथकांनी पूरस्थितीची पाहणी केली.
राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत उघडले. धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्र. ३, ४, ५ व ६ उघडले आहेत.
यातून ५७१२ क्युसेक व वीजनिर्मिती केंद्रातून १५०० क्युसेक असा एकूण ७२१२ क्युसेक इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे. गेले सात-आठ दिवस पाटबंधारे विभागाकडून वीजनिर्मिती केंद्रातून पाण्याचा विसर्ग चालू केला होता.
त्यामुळे संभाव्य पूरस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले. किंबहुना, राधानगरी धरणाचे दरवाजे मागील आठवड्यात उघडले असते तर मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
वारणा धरणातून प्रतिसेकंद ८८७४ घनफूट, तर दूधगंगा (काळम्मावाडी) धरणातून पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग सुरू केल्याने सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीने धोकापातळी गाठली आहे.
तब्बल ६५ मार्ग व ८१ बंधाऱ्यांवर पाणी आल्याने निम्म्या जिल्ह्यातील वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचा परिणाम दूध व भाजीपाल्याच्या आवकेवर झाला आहे. येत्या दोन दिवसांत वारणेसह कोयना धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने शिरोळ तालुक्याला ही पुराचा धोका वाढला आहे.
अलमट्टी जलाशयातून २६ दरवाजांतून तब्बल गुरुवारी (ता. २५) दुपारी दोन लाख ७५ हजार क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. धरण क्षेत्रासह कोल्हापूर, सांगली, चिक्कोडी भागांत पावसाचा जोर वाढल्याने व महाराष्ट्रातील काही धरणांतून विसर्ग करण्यात येणार असल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, अलमट्टीत सायंकाळी तीन लाख क्युसेक विसर्ग सुरू करणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.
अलमट्टी धरणात पाण्याची आवक आणि विसर्ग याकडे दोन्ही राज्य लक्ष ठेवून आहेत. त्यानुसार पाण्याचा विसर्ग वाढवण्याबाबत चर्चा होत आहेत. कर्नाटकातील पूरपरिस्थितीची कर्नाटकातील सरकार आढावा घेत आहे.
दरम्यान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील संभाव्य महापूराच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. २५) आमदार सतेज पाटील कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व एच. के. पाटील यांची भेट घेतली. महापूराची परिस्थिती उद्भवू नये अशा पद्धतीने अलमट्टी धरणातून होणाऱ्या विसर्गाचे आवश्यक ते नियोजन करण्याची सूचना संबंधित अधिकारी व विभागांना करावी, अशी विनंती केली.
कोयना धरणाकडे लक्ष
कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुक्यामध्ये कृष्णा नदीचे पाणी महापुरास कारणीभूत ठरते. कोयनेतून होणारा विसर्ग व अलमट्टीचा फुगवटा यामुळे अनेक गावांमध्ये हाहाकार उडतो. कोयनेतून विसर्ग वाढल्यास पुराची स्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. अजून तरी मोठ्या प्रमाणात कोयनेतून पाण्याचा विसर्ग सुरू नसल्याने सध्या तरी विशेष करून शिरोळ तालुक्यात परिस्थिती नियंत्रणात आहे..
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.