
Marathwada News : छत्रपती संभाजीनगर : गत आठवड्याच्या तुलनेत फेब्रुवारीअखेर मराठवाड्यातील कोरड्या पडलेल्या लघू प्रकल्पांची संख्या पाचने वाढली आहे. शिवाय जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या लघू प्रकल्पांची संख्याही तीनने वाढली असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अहवालातून पुढे आली आहे.
मराठवाड्यात २१ फेब्रुवारीअखेर कोरड्या पडलेल्या लघू प्रकल्पांची संख्या दोन होती. त्यामध्ये धाराशिव व बीडमधील प्रत्येकी एका लघू प्रकल्पाचा समावेश होता. २८ फेब्रुवारीअखेर मात्र कोरड्या पडलेल्या लघू प्रकल्पांची संख्या ७ वर पोहोचली. त्यामध्ये जालन्यातील दोन, बीड व धाराशिवमधील प्रत्येकी एक तसेच हिंगोलीतील तीन लघू प्रकल्पांचा समावेश आहे.
जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या लघू प्रकल्पांची संख्या गत आठवड्यात ४३ होती. त्यामध्येही आता तीनची भर पडली असून ती संख्या ४६ वर पोहोचली आहे. त्यामध्ये जालन्यातील १२, बीडमधील नऊ, लातूरमधील एक, धाराशिवमधील १५, नांदेडमधील ५, परभणी व हिंगोलीतील प्रत्येकी दोन लघू प्रकल्पांचा समावेश आहे.
याशिवाय तीन मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये धाराशिवमधील दोन तर जालन्यातील एका प्रकल्पाचा समावेश आहे. त्यामुळे ज्योत्याखाली पाणीसाठा गेलेल्या एकूण लघू-मध्यम प्रकल्पाची संख्या ४९ वर पोहोचली आहे.
उपयुक्त पाणीसाठा ५८ टक्क्यांवर
मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम मोठ्या प्रकल्पांसह गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा, नदीवरील बंधाऱ्यामधील उपयुक्त पाणीसाठा ५८.२० टक्क्यांवर आला आहे. त्यामध्ये ११ मोठ्या प्रकल्पांतील ६७.७९ टक्के उपयुक्त पाणीसाठ्यासह ७५ मध्यम प्रकल्पांतील ४९.९७ टक्के ,७५१ लघू प्रकल्पांतील ३८.०४ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमधील २६.२७ टक्के तर तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २७ बंधाऱ्यांमधील ८९.४९ टक्के उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे.
७५ मध्यम प्रकल्पांत ५० टक्केच साठा
मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांत सरासरी ५० टक्केच उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. त्यामध्ये जालना जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांत सर्वांत कमी ३७ टक्के, छत्रपती संभाजीनगरमधील १६ प्रकल्पांत ४४ टक्के, लातूरमधील ८ प्रकल्पांत ४९ टक्के, परभणीतील दोन प्रकल्पांत ५२ टक्के, धाराशिवमधील १७ प्रकल्पांत ५४ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पांत ५५ टक्के तर नांदेडमधील ९ मध्यम प्रकल्पांत ५६ टक्के उपयुक्त पाणी उरले आहे.
लघू प्रकल्पांत ३८ टक्के साठा
मराठवाड्यातील ७५१ लघू प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ३८ टक्क्यांवर आला आहे. त्यामध्ये सर्वांत कमी हिंगोली जिल्ह्यातील २७ लघू प्रकल्पांत केवळ २५ टक्के उपयुक्त पाणी उरले आहे. त्यापाठोपात जालना जिल्ह्यातील ५७ लघू प्रकल्पांत ३० टक्के, छत्रपती संभाजीनगरमधील ९८ व परभणीतील २२ प्रकल्पांत सरासरी ३२ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पांत ३३ टक्के, नांदेडमधील ८० प्रकल्पांत ३९ टक्के, धाराशिवमधील २०६ प्रकल्पांत ४० टक्के तर लातूर जिल्ह्यातील १३५ लघू प्रकल्पांत ४९ टक्केच उपयुक्त पाणी उरले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.