Alibaug News : मच्छीमार जेट्टीची दुरवस्था, खाडीमध्ये साचलेले गाळ, बंदराकडे जाणारा अरुंद रस्ता अशा अनेक समस्यांकडे दुर्लक्ष करून मेरिटाइम बोर्डाने व्यावसायिक कंपन्यांसाठी पायघड्या घातल्या आहेत. यामुळे आक्रमक झालेल्या अलिबागमधील मच्छीमारांनी बंदरातील शिपयार्डमध्ये तयार झालेल्या बोटीचा मार्ग रोखून मंगळवारी (ता. १२) आंदोलन केले. यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
खाडीच्या एका बाजूला अलिबाग बंदर तर दुसऱ्या बाजूला साखर-आक्षी बंदर असल्याने वाहतुकीच्या तुलनेत खाडी अरुंद आहे. अरुंद खाडीतून कोकण बार्ज या शिपयार्डमध्ये तयार झालेले बार्ज, मोठ्या प्रवासी नौका मार्गस्थ होतात. शिपयार्डमध्ये तयार होणाऱ्या मोठमोठ्या नौकांचा जलावतरण समारंभ याच खाडीत होतो.
खाडीतून मोठमोठे बार्ज घेऊन जाऊ नये, अशी मागणी मच्छीमार अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. सरकारला कर स्वरूपात उत्पन्न मिळवून देत असल्याने सोयीसुविधा पुरवणे गरजेचे आहे. अपुऱ्या पडणाऱ्या जेटीची दुरुस्तीची मागणी मच्छीमारांनी १५ वर्षांपासून लावून धरली आहे, मात्र त्याकडेही दुर्लक्ष झाल्याने मच्छीमारांनीच स्वखर्चातून जेटी बांधली.
खाडीत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने ओहोटीच्या वेळी बंदरात मासेमारी नौका नांगरताना अनेक अडचणी येतात. नौकांसाठी जागा अपुरी पडत असल्याने उधाणाच्या वेळी नौका एकमेकांवर आपटून नुकसान होण्याचा धोका असतो. बंदरात लिलावगृह, शीतगृहाची सुविधा नाही. बंदराकडे जाणारा मार्गही अरुंद आहे. अशा अनेक समस्यांकडे दुर्लक्ष करीत उद्योगांसाठी पायघड्या घातल्या जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.