Rabbi Sowing : पश्‍चिम विदर्भात रब्बीसाठी पोषक परिस्थिती

Rabbi Season : पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांत खरिपापाठोपाठ येणाऱ्या रब्बीतही शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून राहते.
Rabbi Season
Rabbi Season Agrowon
Published on
Updated on

Akola News: पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांत खरिपापाठोपाठ येणाऱ्या रब्बीतही शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून राहते. रब्बी लागवडीला हळूहळू वेग येऊ लागला आहे. यंदा या तीनही जिल्ह्यांतील प्रकल्पांमध्ये तुडुंब साठा असल्याची समाधानकारक बाब आहे.

हंगामात शेतकरी नवीन पिकांना पसंती देण्याचा काहीसा कलही दिसून येत आहे. मागील तीन, चार वर्षांत खरीप हंगाम सातत्याने शेतकऱ्यांना तोट्याचा जात आहे. ही तूट शेतकरी रब्बीतून काढतात. यंदाही सततच्‍या पावसामुळे खरीप पिकांचे भवितव्य अधांतरी आहे.

सोयाबीनचे नुकसान झाल्याने उत्पादकता एकरी चार-पाच क्विंटलपर्यंत येत आहे. सुरू होत असलेला रब्बी हंगामही महत्त्वाचा आहे. या भागात रब्बीत प्रामुख्याने हरभरा हेच मुख्य पीक असते. अद्याप तरी मोठ्या क्षेत्रावर लागवड होईल, अशा पिकाचा पर्याय मिळालेला नाही.

अकोला जिल्ह्यात रब्बी हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख ३१० हेक्टर आहे. यंदा ओल व सिंचनासाठी पाण्याची शाश्‍वती असल्याने हे क्षेत्र निश्‍चित वाढण्याची शक्यता आहे. गव्हाचेही सरासरी क्षेत्र २० हजार ४८७ हेक्टर आहे.

या वर्षी हे क्षेत्र ओलांडेल. या शिवाय रब्बीत काही क्षेत्रावर ओवा, मागील काही हंगामापासून ज्वारीचीही लागवड केली जात आहे. यंदासुद्धा कल ज्वारीकडे राहू शकतो. वाशीम जिल्ह्यात हरभरा, गव्हासोबतच चिया सीडची लागवड मोठ्या क्षेत्रावर यंदाही होण्याची शक्यता आहे.

Rabbi Season
Rabbi Season : नांदेड जिल्ह्यातून रब्बीसाठी दोन लाख टन खतांची मागणी

डीएपीला कात्री ः

४८ हजार टन आवंटन मंजूर येत्या रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने खते, बी-बियाण्याचे नियोजन केले आहे. रब्बी हंगामासाठी ६० हजार ८२७ टन खतांची कृषी आयुक्तालाकडे मागणी झाली होती. जिल्हा परिषद कृषी विभागाला सुमारे ४८ हजार टन खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे.

कृषी विभागाकडून यंदा ६० हजार ८२७ टन खतांची मागणी आयुक्तालयाकडे झाली होती. त्यात डीएपीची ११ हजार टनांची नोंद होती. प्रत्यक्षात सहा हजार ८६३ टन डीएपी आवंटन मंजूर झाले. तर युरिया १३९०२, एमओपी २१०३, एनपीके १५९७४, एसएसपी ९४७५, एकूण ४८३१७ टन खतांचा समावेश आहे. दुसरीकडे नॅनो युरिया, डीएपीच्या बॉटलचे नियोजन करण्यात आलेले आहे.

या वर्षी पावसात सातत्य राहिले व जास्त पावसामुळे संत्रा, तूर, सोयाबीन आदी पिके अडचणीत आली होती. खरीप हंगामात झालेल्या नुकसानाची भरपाई रब्बी हंगामातून भरून काढण्यासाठी कांदा, कांदा बीजोत्पादन, चिया सीड यांसारखी पिके घेण्यास प्राधान्य राहील. कारण हरभऱ्यामध्ये दरवर्षी मर रोग वाढत आहे. या वर्षी सुद्धा शक्यता अधिक दिसून येत आहे.

- दीपक इढोळे, शेतकरी, इढोळी, जि. वाशीम

या वर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदी- नाले वाहिले. या वर्षी खरीप पिकांच्या उत्पादनात घट झालेली आहे. परंतु त्याची उणीव रब्बीमध्येभरून काढू शकतात. त्यासाठी सरकारने शेतकऱ्याला नियमित वीजपुरवठा दिल्यास सिंचन करणे सोयीचे राहील.

- अजय हिरामण ढोक, प्रगतिशील शेतकरी, इंझोरी, ता. मानोरा, जि. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com