Indian Agriculture : अस्सा शेतकरी नवरा हवा गं बाई....

Indian Farming : साप (जि. सातारा) येथील कल्याण आणि विजय हे जाधव बंधू शालेय वयातच आई-वडिलांना पोरके झाले. बहिणींनी सांभाळ केला. परिस्थितीचे भान ठेवून कष्टातून व दुर्दम्य इच्छाशक्तीतून दोघा बंधूंनी पडीक, माळरान विकसित केले.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon
Published on
Updated on

विकास जाधव

Satara Success Story : साप (जि. सातारा) येथील कल्याण आणि विजय हे जाधव बंधू शालेय वयातच आई-वडिलांना पोरके झाले. बहिणींनी सांभाळ केला. परिस्थितीचे भान ठेवून कष्टातून व दुर्दम्य इच्छाशक्तीतून दोघा बंधूंनी पडीक, माळरान विकसित केले. त्यात आज ऊस व बहारदार आले फुलते आहे. संस्कारी मुले व प्रगत शेतीमुळेच दोघांना लग्नासाठी विचारणा होऊन लग्ने झाली. घरी आर्थिक समृद्धी आली.

सातारा जिल्ह्यातील साप (ता. कोरेगाव) हे सुमारे सात हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथील कल्याण व विजय या जाधव बंधूंची यशकथा प्रेरणादायी आहे. दोघेही दहावी- अकरावी शैक्षणिक वर्षातील वयात असतानाच (२००६) वडिलांचे निधन झाले.

त्याचा धसका घेत त्यानंतर१४ व्या दिवशीच आईचेही निधन झाले. एकाच महिन्यात माता-पित्याचे छत्र हरपल्याचा धोका पेलवणे मुलांना शक्यच नव्हते. पण उपाय नव्हता. काही काळ कल्याण यांनी घर, स्वयंपाक पाहून धाकट्या भावाचा सांभाळ केला.

रंगकाम व्यवसाय करण्याबरोबर स्वतःसह विजय यांचेही शिक्षण केले. विजय शिक्षण घेत भांगलणीची कामेही करू लागले. दोघा भावांची ससेहोलपट सहन न झाल्याने मुंबई येथील विवाहित बहीण जयश्री गावी परतली.

तिच्यासह दुसरी बहीण छाया याच मग दोन्ही भावांच्या आई आणि वडीलही झाल्या. त्यांनीच दोघांना मोठे केले. दोघी भगिनींचे पती सतीश कदम व अप्पासाहेब गायकवाड यांचीही मोठी मदत झाली.

शेतीचा विकास

दरम्यान, मोठे झाल्यानंतर कल्याण व विजय यांनी शेतीत लक्ष घालण्यास सुरुवात केली. सुमारे साडेसहा एकर शेती पडीक व माळरानाची होती. सन २०११ च्या दरम्यान चुलत बंधू शीतलकुमार यांच्या मदतीने सोसायटीचे कर्ज घेऊन विहीर घेतली.

डोंगरालगतच्या शिवारात पाणी नेण्यासाठी अंभेरी येथील अमृत निकम यांनी साडेसात हजार फूट लांबीची पाइपलाइन करण्यासाठी मदत केली. जेवढे भांडवल उपलब्ध होते त्यानुसार २० गुंठ्यांत आले लागवड केली.

खोडव्यासह त्याचे २२ गाड्या (प्रति ५०० किलोची) उत्पादन मिळाले. १६ हजार रुपये प्रति गाडीस दर मिळून अडीच ते तीन लाखांची कमाई झाली. भांडवलात वाढ झाली. त्यातून खडक फोडून अडीच एकर क्षेत्र विकसित केले.

मग २० गुंठ्यांत को ८६०३२ ऊस लागवड केली. प्रति ऊस १० रुपये या दराने त्याचे बेणे विकून दोन लाख रुपये कमावले. आत्मविश्‍वास येऊ लागला. शेतीत जम बसू लागला. आले व उसाचे क्षेत्र वाढू लागले. पुढे आले बेणे विक्रीतून साडेसात लाख रुपये मिळाले. विहिरीसाठी काढलेले कर्ज व पाइपलाइनसाठीची उधारी चुकती करून जाधव बंधू कर्जमुक्त झाले.

Indian Agriculture
Farmer As Life Partner : शेतकरीच नवरा हवा गं बाई..!

आजची बहरलेली शेती

दरम्यान, विजय यांनी तीन वर्षे पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीही केली. त्यानंतर मात्र शेतीचाच विकास करायचा असे ठरवून ते गावी परतले. डोंगरालगतचे सर्व क्षेत्र वहिवाटीखाली आणले. संपूर्ण ठिबक सिंचन केले.

मोबाइलद्वारे पाणी देण्याची सोय केली. पूर्वीची तीन एकर बागायती, साडेदहा एकर माळरान व खंडाने सहा एकर अशी आजमितीला साडेसोळा एकरांवर जाधव बंधूंची शेती बहरली आहे. यात दहा एकर ऊस, दोन एकर आले आहे. बांधावर व मोकळ्या जागेत आंबा, नारळ, फणस, चिकू, सफरचंद, लिंबू आदी दोनशेहून अधिक झाडांची लागवड ‘मनरेगा’तून केली आहे.

उल्लेखनीय उत्पादन

-ऊस व आल्याची अत्यंत नियोजनबद्ध शेती.
-प्रत्येक काम वेळेत करण्यावर भर.
-आडसाली उसाचे एकरी १०३ ते १०७ टन, तर सुरू उसाचे ६० ते ६५ टन उत्पादन
-आले पिकात दहा वर्षांहून अधिक काळ अनुभव. त्याचे एकरी ३० ते ३२ गाड्या, तर खोडव्यासह ४० ते ५० गाड्यांपर्यंत उत्पादन.
-एकूण क्षैत्रापैकी दोन एकर क्षेत्र ऊस बेण्यासाठी राखीव. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथून रोपे मागवून नर्सरी केली जाते. प्रति मोळी (१० उसांची) शंभर रुपये दराने विक्री होते. त्यातून दरवर्षी काही लाख रुपये मिळतात.

शेतीमुळेच ठरली लग्ने

खरे तर शेतकरी मुलगा म्हटले की कोणी मुलगी द्यायला पुढे येत नाही अशी आजची ज्वलंत समस्या आहे. पण जाधव बंधूंच्या बाबतीत घडले उलटेच. एकदा बेणे प्लॉट पाहायला त्यांच्याकडे शेतकरी मंडळी आली. सर्व जण शेती पाहून प्रसन्न झाले.

चर्चेतून कल्याण लग्नाचे असल्याचे कळले. प्रयोगशील, उत्तम शेती करणाऱ्या सुस्वभावी, कष्टकरी मुलाला आपल्या घरातील मुलगी द्यावी असे मंडळींकडील एका व्यक्तीला वाटले. त्यातून पुढे कल्याण यांचे लग्न झाले देखील.

कोरोना काळात एका शेतकऱ्याने आल्याचे भरघोस उत्पादन घेतल्याचे स्थानिक व्यापाऱ्यामार्फंत एका परिचिताला समजले. विजय हे ते शेतकरी असल्याचे समजले. चर्चा व भेटीतून संबंधित व्यक्तीकडून मुलीचे स्थळ आले.

ती मुलगी शिक्षिका होती. पण शेतीतील कष्ट, प्रगतीची धडपड व संस्कार पाहून विजय यांनाही मुलीकडील मंडळींकडून होकार आला आणि लग्न धामधुमीत पार पडले देखील. आम्हा दोन्ही भावांवर चांगले संस्कार असून कसलेही व्यसन नसल्याचे विजय यांनी सांगितले.

शेतीतील प्रगती

बाराशे चौरस फुटांचे तीन मजली घर, चारचाकी वाहन आहे. कल्याण, पत्नी अनुराधा, विजय, पत्नी श्यामल व मुले असा संयुक्त परिवार आहे. दोन्ही बहिणी व दाजींचा भावांना आजही आधार आहे. अमृत निकम, बापूसो सूर्यवंशी, ऋषिकेश तुपे, कृषी पर्यवेक्षक सुरेखा पवार, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भूषण यादगीरवार यांच्या मार्गदर्शनाचा प्रगतीत हातभार आहे.

विजय जाधव, ९७६६६३७०१०
कल्याण जाधव, ८६००४४१८१६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com