Alibaug Agriculture News : खरीप हंगामात लागवडीसाठी शेतकऱ्यांची भात बियाणे खरेदीची लगबग सुरू झाली; मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कंपन्यांच्या बियाण्यांकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
तीन वर्षांपूर्वी कंपन्यांची बियाणे बोगस निघाली होती, त्याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. यामुळे स्वतःच्या शेतात पिकवलेले किंवा दुसऱ्या शेतकऱ्यांकडून बियाणे उसनवारी घेण्याची प्रथा रायगड जिल्ह्यात पुन्हा सुरू झाली आहे.
जेव्हा कंपन्यांची संकरित बियाणे विकसित झाली नव्हती तेव्हा उसनवारीने घेतलेली बियाणे वापरली जायची. सध्या रायगडमधील ३० टक्के शेतकरी उसनवारीचे बियाणे वापरत आहेत. जिल्ह्यातील सरकारी आकडेवारीनुसार, एक लाख सात हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली आहे.
यात अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने त्यांना कंपन्यांकडून विकत घेतलेले बियाणे परवडण्यासारखे नाही. त्यात बियाणे बोगस निघाल्यास मोठा आर्थिक फटका बसतो.
नुकसानभरपाईच्या निकषात गुंठ्यामध्ये असलेले क्षेत्र बसत नसल्याने नुकसान भरपाई मिळवण्यात अडचणी येतात. २०१९ पर्यंत शेतकऱ्यांनी सुधारित वाणाचा वापर करून भाताचे उत्पन्न घेतले, परंतु अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने पुन्हा उसनवारीचे बियाणे वापरण्याकडे कल वाढला आहे. यामुळे महाबीजसह इतर कंपन्यांच्या बियाणांची विक्रीत सातत्याने घट होत आहे.
साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी सुरू होते. त्यासाठी आतापासूनच बाजारात बी-बियाणे, खते उपलब्ध झाले आहेत. राज्य सरकारच्या महाबीज या कंपनीकडूनही शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या वाणांची बियाणे उपलब्ध करून दिले जाते. तसेच वेगवेगळ्या खासगी कंपन्यांनी यंदा ५० ते ६० प्रकारचे बियाणे बाजारात उपलब्ध करून दिले आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.