Agriculture Electricity
Agriculture Electricityagrowon

Agriculture Electricity : खानदेशात खंडित वीजपुरवठ्याने शेतकरी मेटाकुटीस

Khandesh News : खानदेशात ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत नाही. शेतीपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, पंप नादुरुस्त होत आहेत.
Published on

Jalgaon News : खानदेशात ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत नाही. शेतीपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, पंप नादुरुस्त होत आहेत. दिवसा फक्त साडेपाच ते सहा तास वीज शेतीपंपांना मिळत आहे. सध्या वीजवापर कमी असतानाही पुरवठा विस्कळीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पुढे रब्बी हंगाम किंवा आगाप रब्बीला सुरुवात होणार आहे. सध्या केळी, कलिंगड, पपई व अन्य पिकांत विद्राव्य खते देण्यासाठी कृषिपंप दोन-तीन दिवसाआड शेतकरी सुरू करीत आहेत. परंतु वीजपुरवठा व्यवस्थित नाही. वितरण कंपनी मात्र खंडित वीजपुरवठ्याबाबत मौन बाळगून आहे. कुठलीही सकारात्मक कार्यवाही याबाबत केली जात नाही.

पावसाळा सुरू असतानाही वीजपुरवठ्याची समस्या आहे. खते ड्रीपमधून देण्यासाठी शेतीपंप सर्वत्र सुरू केले जातात. पण वीजपुरवठ्याची समस्यादेखील समोर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. धुळे, जळगाव व नंदुरबारातील सर्वच भागांत शेतीपंपांना अनियमित वीजपुरवठा केला जात असून, ग्रामस्थ व शेतकरी वैतागले आहेत.

Agriculture Electricity
Agriculture Electricity Scheme : बळीराजा वीज सवलत योजनेत ४६ कोटी रुपये वीजबिल माफी

विजेच्या लपंडावामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही परिस्थिती न सुधारल्यास शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.

शहादा, तळोदा, जळगावमधील चोपडा, जळगाव, यावल, रावेर, धुळ्यातील शिरपूर, साक्री, धुळे आदी परिसरांत वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. दिवसभर विजेचा लपंडाव सुरू असतो. रब्बी हंगाम लवकरच सुरू होणार असल्याने विहिरी, कूपनलिकांमधून पिकांना पाणी देण्यात येईल. सर्वच कृषिपंप सुरू होतील.

अनियमित वीजपुरवठा, वारंवार बदलणारा विजेचा दाब यामुळे शेतीपंप खराब होत होण्याची समस्याही असणार आहे. शेतकऱ्यांना यामुळे आर्थिक फटका बसत आहे. रहिवासी भागातही इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनियमित वीजपुरवठ्यामुळे नादुरुस्त होतात. वीज वेळेवर मिळत नसताना वीजबिले मात्र अगदी नियमित आणि प्रत्यक्ष वीज वापरापेक्षा अधिक दिली जातात.

Agriculture Electricity
Agriculture Electricity : साडेसात अश्‍वशक्तीवरील पंपांनाही मोफत वीजपुरवठा करा

गावठाणासाठी किमान २० तास, तर शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा करण्याची तरतूद आहे; परंतु निर्धारित वेळेत सुरळीत वीजपुरवठा अनेक भागांत होत नाही. शेतीला दिवसा फक्त साडेपाच ते सहा तास वीज मिळत आहे. अनियमित वीजपुरवठ्याचा परिणाम पाणीपुरवठा यंत्रणेवरही जाणवतो. मध्येच वीज कंपनीचे कर्मचारी, अधिकारी तांत्रिक काम हाती घेऊन वीजपुरवठा बंद करतात.

रोहित्रे दुरुस्त करा

वीजपुरवठा यंत्रणेत अनेक रोहित्रे नादुरुस्त, तर काही कायमस्वरूपी बंद असल्याचे दिसत आहे. वीजतारांची अवस्थाही भीषण आहे. बऱ्याच जागी या तारा लोंबकळल्या असून, काही ठिकाणी झाडाच्या फांद्यांमध्ये अडकल्या आहेत. मात्र त्यांच्या दुरुस्तीची तसदी वीज कंपनी घेत नाही. परिणामी अनेकदा तक्रार करूनही वीजपुरवठ्याची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. किमान वरिष्ठांनी त्याची नोंद घेऊन कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com