
Monsoon Season : देशात चालू खरीप हंगामात गेल्यावर्षीच्या तुलनेत ४ टक्क्यांनी पेरणी आघाडी आहे. ८ ऑगस्टपर्यंत ९९५.६३ लाख हेक्टरवरील पेरा पूर्ण झाला आहे. आतापर्यंत देशात कापूस, सोयाबीन, तूर पिछाडीवर आहेत. तर भात, मका आणि ऊस पेरणी क्षेत्र आघाडीवर आहे. भात आणि मक्याला शेतकऱ्यांची जास्त पसंती असल्याचे केंद्र सरकारच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे.
देशात खरीपाचे सरासरी १ हजार ९७ लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे. मॉन्सूनच्या पावसाने यंदा लवकर आगमन केले. तसेच जून आणि जुलै महिन्यात पावसाने विविध राज्यात हजेरी लावली.
हवामान विभागाच्या अंदाजाच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल. त्यामुळे पेरणीच्या कामाला गती आली. महाराष्ट्रासह विविध राज्यांत पावसाचे वितरण असमान झाले आहे. त्याचा पिकाला फटका बसत आहे. तसेच सप्टेंबरमध्ये काढणीच्या वेळी अतिवृष्टी झाली तर पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, अशी चिंता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
पावसाच्या हजेरीने मात्र पेरणी लवकर होत आहे. त्यामुळे यंदा खरीपाचा पेरा आघाडीवर आहे. देशात गेल्यावर्षी ८ ऑगस्ट अखेर ९५७.१५ लाख हेक्टरवर पेरा झाला होता. यंदा मात्र याच कालावधीत पेरा ९९५.६३ लाख हेक्टरवर झाला आहे. त्यामुळे यंदा पेरणी क्षेत्र ४.०२ टक्के आघाडीवर आहे. तर ऊसाची लागवड मागील वर्षीच्या तुलनेत २.९ टक्के आघाडी असून जवळपास ऊस लागवड पूर्ण झाली आहे.
कापूस पिछाडीवर
कापसाचा सरासरी पेरा भातानंतर सर्वाधिक आहे. परंतु यंदा मात्र कापूस लागवडीच्या क्षेत्रात ३.२ टक्के पिछाडी आहे. गेल्यावर्षी कापसाचे क्षेत्र ११०.४९ लाख हेक्टर होते. यंदा मात्र कापसाचा आतापर्यंत १०९.६९ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. कापसाला बाजारात हमीभावापेक्षा कमी दर गेल्या हंगामात मिळाला. त्यामुळे कापूस पेऱ्यावर परिणाम झाल्याचे दिसत आहे.
सोयाबीनची पसंती घटली?
देशभरात सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमी राहिले. त्यामुळे सोयाबीन पिकाला शेतकऱ्यांची पसंती कमी राहिल्याचे दिसत आहे. यंदाच्या खरीपात आत्तापर्यंत सोयाबीनचे क्षेत्र ३.८ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. सोयाबीनचा एकूण पेरा आत्तापर्यंत ११९.५१ लाख हेक्टर झाला आहे. तसेच तेलबियामध्ये शेंगदाणा, सुर्यफुल, तीळ, कारळे पिछाडीवर आहे. त्यामुळे एकूण तेलबिया पिकांचा पेरा ३.८ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. तेलबिया पिकाखालील एकूण क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत ३.७ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. आतापर्यंत खरीपात तेलबियाची १७५.६१ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे.
तुरीकडे पाठ?
गेल्यावर्षी तुरीला अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीकडे पाठ फिरवली आहे. यंदाच्या खरीपात आत्तापर्यंत तुरीचे क्षेत्र ४.७ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. गेल्यावर्षी ४२.८७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला होता. यंदा तुरीचा पेरा आत्तापर्यंत ४०.८६ टक्क्यांवर आहे. तर उडीदाचा पेरा १.२ टक्के आघाडीवर असून मुगाने २.७ टक्क्यांने आघाडी घेतली आहे.
मक्याला आणि भाताला पसंती
यंदाच्या खरीपात मक्याला शेतकऱ्यांची पसंती दिसत आहे. मक्याचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत १०.५ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्यावर्षी मक्याची पेरणी याच कालावधीत ८३.१५ लाख हेक्टरवर झाली होती. यंदा मात्र मक्याचे क्षेत्र ९१.८९ लाख हेक्टरवर पोहचले आहे. तर भाताच्या क्षेत्रात १२.१ टक्के आघाडी दिसत आहे. आत्तापर्यंत भाताची पेरणी ३६४.८ लाख हेक्टरवर पोहचली आहे. ज्वारी, बाजरी क्षेत्र मात्र पिछाडी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.