
Chandrpur News : रडणाऱ्यांचे नाही तर लढणाऱ्यांचे हे जग आहे, असे म्हटले जाते. याच आशावादातून परिस्थितीशी दोन हात करीत एका अल्पभूधारक शेतकरी कन्येने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा गड सर करीत उपविभागीय कृषी अधिकारी पदापर्यंत मजल गाठली आहे. कविता दिगंबर हरिणखेडे असे या लढवय्या तरुणीचे नाव आहे.
दुर्गम गोंदिया जिल्ह्यातील परसवाडा गावची रहिवासी असलेल्या कविताचे वडील शेती करतात. या कुटुंबीयांकडे अवघी पाच एकर शेती आहे. त्यामध्ये या भागातील मुख्य पीक धान घेतले जाते. कवितासह कुटुंबात तिच्या दोन बहिणी असून त्यांची लग्न झाली आहेत. घरच्या परिस्थितीची जाण असलेल्या कविता यांनी नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर २०१६ ते २०१८ या कालावधीत नागपूर कृषी महाविद्यालयातून बीएसी (ॲग्री) आणि एमएससी (ॲग्री) हे २०२१ या वर्षात अकोला कृषी महाविद्यालयातून पूर्ण केले. अकोला येथे शिक्षण घेत असताना कविताची पावले कृषी विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा फोरमकडे वळली.
कोणतीही अतिरिक्त शिकवणी न लावता याच ठिकाणी तासन् तास अभ्यासाला बसत तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. त्यानुसार कविताने पहिल्याच प्रयत्नात लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून परिस्थितीला दोष देत निव्वळ रडत बसणाऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
नुकताच स्वीकारला प्रभार
अल्पभूधारक कुटुंबातील कविता हरिणखेडे यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा देत ती उत्तीर्ण केली. त्याआधारे त्यांची नियुक्ती वरोरा (चंद्रपूर) उपविभागीय कृषी अधिकारी पदी करण्यात आली आहे. सोमवारी (ता. २१) त्यांनी आपला प्रभार स्वीकारला. पहिल्या टप्प्यात कामकाज शिकण्यावर भर देत त्यानंतरच्या काळात कृषिपूरक योजनांच्या प्रसारावर भर देणार असल्याचे कविता यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.