Nashik News : ‘‘कांदा हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे पीक आहे. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सत्ताधारी लोकांवर नाराजी आहे. धुळे, नाशिक, सातारा जिल्ह्यांतील कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहेत. ऊस महत्त्वाचे पीक आहे. त्यापासून इथेनॉल आणि इतर उत्पादने तयार होतात.
मात्र केंद्र सरकारची धरसोड वृत्ती आहे, त्याचा फटका बसत असल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केली.
श्री. पवार हे बुधवारी (ता.१३) नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी या दौऱ्यात निफाड येथील सभेपूर्वी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला. श्री. पवार म्हणाले, ‘‘बेरोजगारी, महागाईमुळे मध्यमवर्गीय व सर्वसामान्य जनता अस्वस्थ आहे. याची किंमत सत्ताधारी पक्षाला मोजावी लागेल. सत्ताधारी पक्षाकडे सांगण्यासारखे काही नाही.
ईडी, सीबीआय यांसारख्या यंत्रणांचा वापर विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी केला जात आहे. मात्र त्यात निष्कर्ष ०.५ टक्का निघाला. म्हणून ईडी फक्त विरोधकांसाठी वापरली जाते. उद्धव ठाकरे सभा घेतील. मीही सभा घेत आहे. वेळ मर्यादित असल्याने सर्व जण कामाला लागलो आहोत. लोकांचा कौल महाविकास आघाडीला आहे, तर सत्ताधारी पक्षावर शेतकऱ्यांची नाराजी दिसते.’’
जागेच्या संदर्भातील शंका सोडविण्याचा प्रयत्न
‘‘मोदींचे सरकार घालविले पाहिजे, या संदर्भात शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीत एकमत आहे. त्यामुळे जागेच्या संदर्भात काही शंका आहेत, त्या सोडविण्याचा प्रयत्न आहे,’’ असे श्री. पवार यांनी नमूद केले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.