Washim News : रिसोड तालुक्यातील बऱ्याच गावामध्ये अनेक शेतकरी अद्यापही दुष्काळी अनुदान रक्कमेपासून वंचित असल्याचे चित्र रिसोड तालुक्यात पहावयास मिळत आहे. यावर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगामात सोयाबीन, तूर, पिकांची पेरणी झाल्यापासून अनेक नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला.
त्याचा परिणाम सोयाबीनचा उत्पादन खर्च वसुलीपेक्षा फारसे शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व भिस्त दुसरे मुख्य पीक असलेल्या तुरीवर होती. हे पीकही चांगल्या अवस्थेत होते. परंतु पुन्हा नैसर्गिक संकटाची मालिका सुरु झाली. ऐन तूर पीक काढणीवेळी आलेल्या पावसाने तूर पीक होत्याचे नव्हते झाले.
एकरी एक पोत्याचा उतारा आला. सोयाबीन, तूर पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी अनेक संघटना, पक्षांनी शासन दरबारी मागणी केली. याचे फलित म्हणून शासनाने शेतकऱ्यांना भरीव मदत केली. पण ही मदत आता सर्व्हरच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
त्यातच तालुक्यातील अनेक गावामधील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई याद्या अद्यापही तहसीलमध्ये जमा न झाल्याने शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक यादी मिळेना. त्याचाच एक भाग म्हणून लोणी खुर्द गावात पहिल्या यादीमध्ये जवळपास ८० शेतकऱ्याचे विशिष्ट क्रमांक तयार झाले. त्यांची ईकेवायसी होऊन अनुदान ही खात्यात जमा झाले.
परंतु त्या नंतर संबंधित कर्मचारी हे निवडणूक कामात व्यस्त असल्याचे कारण दाखवत अद्यापही त्यांनी दुसरी यादी तहसील कार्यालयात दिली नसल्याने शेतकरी हक्काच्या दुष्काळी निधी पासून वंचित आहेत. त्यामुळे ई-केवायसी करण्यापासून वंचित असलेल्या उर्वरित शेतकऱ्यांमध्ये अनुदान मिळणार की नाही याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यातच महाराष्ट्र शासनाचे मदत व पुनर्वसन विभागाचे अनुदान वितरण प्रणाली पोर्टल तात्पुरते बंद असल्याने शेतकऱ्यांना मिळत असलेल्या नुकसान भरपाईच्या कामात तांत्रिक व कृत्रिम अडचणी निर्माण झाल्या आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.