
Ahilyanagar News : कुठलाही परवाना नसताना व संबंधित खताच्या गोण्यावर कोणतेही कन्टेंट नसताना केवळ सेंद्रिय खत असे सांगून शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी साठा करून ठेवलेले साडेसात लाख रुपये किमतीची पावडर व विद्राव्य खत जप्त केले आहे. कृषी विभागाच्या पथकाने दोन दिवसांत पाथरे (ता. राहुरी) व श्रीरामपूर येथील एमआयडीसीत ही कारवाई केली.
सेंद्रिय उत्पादनाला अधिक मागणी असल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात सेंद्रिय, विद्राव्य खते, फळबागा, भाजीपाल्याची वाढ व्हावी म्हणून फवारणीचे औषधी विक्री करऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. मोठ्या प्रमाणात अशा खतांची विक्री होते. संबंधित खत खरे की खोटे याबाबत मात्र खात्री देता येत नाही.
राहुरी तालुक्यातील पाथरे येथे सेंद्रिय खत व विद्राव्य खताची विनापरवाना विक्री केली जात असून त्याचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांच्या आदेशाने जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक राहुल ढगे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी नारायण अनारसे यांनी पाथरे येथील चैतन्य हार्डवेअर या दुकानाच्या गोडावूनमध्ये धाड टाकून तपासणी केली असता ५० किलो वजनाच्या खताच्या गोण्या, १० किलोच्या बादल्या व १ लिटरचे विद्राव्य खताच्या बाटल्या मिळून साडेसात लाख रुपये किमतीचे खत जप्त केले.
संबंधित दुकानमालकाकडे कोणतेही खत विक्रीचा परवाना आढळून आला नाही. राहुल ढगे यांच्या फिर्यादीवरून संदीप यमाजी जाधव यांच्यावर राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. श्रीरामपूर येथील एमआयडीसीतही अशीच कृषी विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे.
श्रीरामपूर येथील एमआयडीसीत उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, तंत्र अधिकारी अमोल काळे, तालुका कृषी अधिकारी उल्हास राक्षे, मोहीम अधिकारी नीलेश अभंग यांनी कृषी समृद्धी क्राॅप सोल्यूशन या दुकानावर धाड टाकून तपासणी केली असता ५० किलो वजनाच्या ३९५ गोण्या, दहा किलो वजनाच्या ५ बादल्या, १ लिटर वजनाच्या कीटकनाशकांच्या बाटल्या आढळून आल्या.
त्यांच्याकडेही कोणताच खत विक्रीचा परवाना आढळून आला नाही.पथकाने २ लाख ८२ हजार रुपये किमतीचे खत जप्त केले असून तंत्र अधिकारी अमोल काळे यांच्या फिर्यादीवरून योगेश अशोक नगरकर यांच्यावर श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बनावट खत असण्याची शक्यता
अहिल्यानगर जिल्ह्यात बोगस खते, फवारणीची, कीडनाशक विक्रीचे प्रकार सर्रास सुरु आहे. दोन वर्षापूर्वी कर्जत तालुक्यात काही शेतकऱ्यांच्या फवारणीमुळे कोट्यावधीचे नुकसान झाले होते. त्यासह मागील काळात अहिल्यानगर जिल्ह्यातही असे मातीचा वापर करून बोगस खत तयार केले जात असल्याबाबत माहिती होती.
मात्र त्यावर कारवाई झाली नाही. श्रीरामपूर व राहुरी येथे सेंद्रिय म्हणून विक्री होत असलेल्या खत हे दुसऱ्या राज्यातून आणून विक्री केले जात असल्याची शक्यता आहे. कृषी विभागाने संबंधित खताचे नमुने घेतले असून ते खरे की बोगस खत हे तपासणीनंतर कळेल. मात्र यापूर्वी अशा खतामुळे झालेले नुकसान पाहता हे खतही बनावट असण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी तपासणी अहवाल काय येतो याकडे शेतकऱ्यांसह सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.