Gondia News : संकलन केंद्रावरील आवक घटली असतानाच आता पुन्हा शासनाकडून धान खरेदीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांनी पूर्वीच धान विकल्याने यंदा २५ लाख क्विंटलचाही आकडा गाठणे कठीण असल्याची चर्चा आहे.
बाजारात धानाला हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये या उद्देशाने शासनाकडून बाजार हस्तक्षेप योजना राबविली जाते. त्या अंतर्गंत नोंदणीकृत शेतकऱ्यांचा धान हमीभावाने खरेदी केला जातो. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात ही प्रक्रिया राबविण्यात येते. यंदा शासनाने धानाला २१८३ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे.
त्यानुसर २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा मार्केटिंगच्या १८३ खरेदी केंद्रावरून ७६ हजार शेतकऱ्यांकडून २४ लाख ७० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली. शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी म्हणून जिल्ह्यातील १ लख २५ हजार १२९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
यातील ५० हजारांवर शेतकऱ्यांनी धान विकला. उर्वरित धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र त्यानंतर देखील धान केंद्रावर आवक पूर्णपणे घटली आहे. परिणामी धान खरेदीचा २५ लाख क्विंटलचा आकडा गाठणे देखील प्रशासनाला अवघड झाले आहे.
निधी जमा होण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष
विशेष म्हणजे शासनाकडून धान उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टर २० हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. घोषणा केल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी या संबंधीचे आदेश काढण्यात आले. आता हा निधी खात्यात कधी जमा होतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.