
Akola News: ‘‘आज तुम्हाला मिळालेली पदवी ही तुमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. तुम्ही घेतलेल्या ज्ञानाचा समाजासाठी, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी उपयोग करा,’’ असा सल्ला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दिला.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित ३९ दीक्षान्त सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, कामगारमंत्री तथा पालकमंत्री आकाश फुंडकर, कर्नाटक कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई, ‘पंदेकृवि’चे कुलगुरू डॉ. शरद गडाख, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, कुलसचिव, माजी कुलगुरू, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य व विद्यापीठाचे विभागप्रमुख उपस्थित होते. समारंभात एकूण ४ हजार ४० स्नातकांना विविध पदव्या प्रदान करण्यात आल्या.
राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, ‘‘विदर्भात ११ जिल्ह्यांत विस्तार असलेले हे विद्यापीठ खऱ्या अर्थाने उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बीजनिर्मिती, पशुधन विकास, आदर्श ग्राम प्रकल्प अशा उपक्रमांबरोबरच नवनव्या अभ्यासक्रमातून अनेक विद्याशाखांचा विकास केला आहे. बीजोत्पादनात विद्यापीठाने मोठी उपलब्धी मिळवली. शिवारफेरी, हॉर्टीकल्चर डे, कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून विस्ताराचे मोठे काम विद्यापीठ करीत आहे,’’ असे सांगत त्यांनी सविस्तरपणे प्रमुख मार्गदर्शन केले.
कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, की वातावरण बदलामुळे शेतीत बदल करावा लागेल. तंत्रज्ञानाचा वापर वाढवत उत्पादन खर्च कमी करावा लागेल. आज पदवी घेतल्यानंतर फार कमी विद्यार्थी शेतीत राबतात. पण आपले ज्ञान शेतीत द्या. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. भविष्यात शेती क्षेत्रच आधारस्तंभ ठरणार आहे. या क्षेत्राला नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले पाहिजे.
प्रमुख मार्गदर्शक डॉ. दलवाई म्हणाले, की तुम्ही आयुष्यात जे काही बनलात ते तुम्ही सर्व जण चांगले माणूस बनून राहा. सर्व काही देवावर आणि नशिबावर सोडणे म्हणजे आपल्या आळशीपणामुळे अपयश स्वीकारण्यासारखे आहे.
...यांना मिळाली आचार्य पदवी
ओगुवॉयनवा श्रीकांथ यादव, संजय भुयार, सुनील ठावरी, काजल जानकर, पायल कोसे, विनय हेगडे, दशरथ सारंग, काजल भोयर, विशाल पाटील, अनिकेत पाटील, श्रुथ्य. एम, मनिथा इलिझाबेथ, कांतिलाल चांदे, ऐश्वर्या पाटील, अभिजित ठाकरे, सचिन शिंदे, जया गिरी, सिद्धेश भागवत, दीपाली चाटसे, आशा बहादुरे, अश्विनी एन, सुलेमान खान, अंकिता शिंदे, रींजू लुकोसे, प्राजक्ता फदतारे
अम्रिथा प्रिया बी हिला सर्वाधिक पदके
नागपूर येथील कृषी महाविद्यालयाची एमएसस्सीची विद्यार्थिनी अम्रिथा प्रिया बी हिला सात सुवर्ण व एक रौप्य असे सर्वाधिक आठ पदके मिळाली. तर अकोला येथील एमएसस्सीची वेंगलदास चैतन्या हिने तीन सुवर्ण व दोन रौप्य असे पाच पदकांची कमाई केली. एमएसस्सी उद्यानविद्या विषयात वाशी हरिका हिला दोन सुवर्ण व दोन रोख असे चार पदके मिळाली.
तर बीएसस्सी कृषीमध्ये उमरखेड कृषी महाविद्यालयाची प्रियांका संजय मुंजे हिला दोन सुवर्ण, दोन रौप्य, तीन रोख अशी सात पदके मिळाली. बीटेक कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेची शेजल संतोष सातव हिला दोन सुवर्ण, एक रौप्य, चार रोख असे एकूण सात आणि निशांत मनोहरराव गोरमारे (कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव जामोद) याला दोन सुवर्ण, एक रौप्य व दोन रोख असे पाच पदके मिळाली. याशिवाय इतर पदकांच्या संख्येत मुलींचीच संख्या लक्षवेधी ठरली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.