Chhatrapati Sambhajinagar : शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनाचे प्रमाण वाढविण्याच्या प्रयत्नात जमिनीचा पोत बिघडून भविष्यात जमिनीच्या उत्पादकतेत घट होते. जल, मृद्संधारण उपाययोजनांच्या अभावी माती वाहून जाण्याचे प्रमाण वाढते. यामुळे शेतीचा ऱ्हास होऊन नुकसान होते, हे टाळण्यासाठी सर्वंकष कृषी विकासाच्या उपाययोजनांवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा सोमवारी (ता. २४) घेण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, आत्मा प्रकल्प उपसंचालक ए. यू. कुलकर्णी, सहा. आयुक्त मत्स्यविकास डॉ. मधुरिमा जाधव, सहा, आयुक्त पशुसंवर्धन आर. डी. इंगळे, जिल्हा दुग्धविकास अधिकारी मनिषा हराळ मोरे, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनीष दौंड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लढ्ढा आदी विविध विभागांचे अधिकारी सहभागी होते.
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, आत्मा नियामक मंडळ, प्रधानमंत्री पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आदी योजना व कार्यक्रमांबाबत आढावा घेण्यात आला. शिवाय कृषी विस्तार सुधारणा, परंपरागत कृषी विकास योजना, सेंद्रिय शेती, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन, प्रधानमंत्री पीकविमा योजना याबाबत आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, की शेतीचा पर्यावरणीय ऱ्हास थांबविण्यासाठी जलमृदा संधारणावर भर द्यावा. माती वाहून जाणे थांबवा. वृक्ष लागवडीवर भर द्यावा. नैसर्गिक पद्धतीने शेती करण्यास चालना द्यावी दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, प्रक्रिया उद्योग अशा सर्व घटकांचा विकास करून शेती विकासाला चालना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
जिल्हातील १५४१ प्रस्तावांना मान्यता
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत जिल्हातील १५४१ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात ४०६ गावांचा समावेश असून, आतापर्यंत या प्रकल्पांतर्गत १ लाख ४ हजार ५३ लाभार्थ्यांना ९९४ कोटी ५० लक्ष रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. तसेच १८९८ शेतकरी गटांना १८९ कोटी ४५ लाख ५२६ रुपयांचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली.
६ कोटी ३१ लक्ष ५७४ घ. मी. गाळ काढला
यंदा जिल्ह्यात ६ कोटी ३१ लक्ष ५७४ घ.मी. गाळ काढण्यात आला व तो ६०० हेक्टर क्षेत्रावर पसरविण्यात आला. जिल्ह्यात धरणातील गाळ हा शेतात टाकल्यामुळे शेतीच्या वाढलेल्या उत्पादकतेबाबत मोजमाप करुन त्याचे दस्तऐवजीकरण करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.