Banana Farming : मृग बाग लागवडीवर भर

Article by Chandrakant Jadhav : नीलेश पाटील यांच्या संयुक्त कुटुंबाची निंबोल (ता. रावेर, जि. जळगाव) शिवारात १६० एकर शेती आहे. जमीन काळी कसदार जमीन आहे.
Banana Farming
Banana FarmingAgrowon

Farmer Management of Banana Cultivation :

शेतकरी नियोजन

पीक : केळी

शेतकरी : नीलेश अशोक पाटील

गाव : निंबोल, ता. रावेर, जि. जळगाव

केळी लागवड : ८० एकर (एक लाख २५ हजार झाडे)

नीलेश पाटील यांच्या संयुक्त कुटुंबाची निंबोल (ता. रावेर, जि. जळगाव) शिवारात १६० एकर शेती आहे. जमीन काळी कसदार जमीन आहे. तापी नदीच्या लाभक्षेत्रात शेती असल्याने सिंचनाच्या पुरेशी उपलब्धता आहे. शिवाय त्यांनी १० कूपनलिका घेतल्या आहेत.

Banana Farming
Banana Farming : निर्यातक्षम उत्पादनासाठी उतिसंवर्धित रोपांचा वापर

केळी प्रमुख पीक आहे. तसेच मका, कापूस, हळद, तूर आदी पिकांचे उत्पादन विविध हंगामांत घेतले जाते. रब्बीमध्ये गहू, हरभरा व इतर पिके फेरपालटीसाठी घेतात. नवती किंवा मृग बहर (जून, जुलै लागवड) केळीची लागवड करण्यावर भर दिला जातो. शिवाय काही प्रमाणात ऑक्टोबरमध्ये कांदेबाग केळीची लागवडदेखील केली जाते.

एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने केळीची लागवड सुरू होते. त्यामुळे बाजारातील अस्थिरतेचा परिणाम टाळण्यास मदत होते. लागवडीसाठी ग्रॅण्ड नैन या जातीच्या १०० टक्के उतिसंवर्धित रोपांचा उपयोग केला जातो.

लागवडीसाठी अर्धा फूट उंच व पावणेचार फूट रुंद गादीवाफे तयार करून त्यावर सिंगल लॅटरल टाकल्या जातात. लागवड साडेपाच बाय साडेपाच या अंतरात केली जाते. बेवडसाठी गहू, हरभरा, तूर पिके घेतली जातात. निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. शेतीमध्ये नीलेश यांना वडील अशोक पाटील यांच्यासह रामदास पाटील, मोहन पाटील यांचे मार्गदर्शन मिळते.

व्यवस्थापनातील बाबी

सध्या मृग बहराची बाग ७ ते ८ महिन्यांची झाली आहे. लागवड विविध टप्प्यांत केल्यामुळे बागा देखील वाढीच्या विविध अवस्थेत आहेत. त्यानुसार केळी बागांचे नियोजन आणि व्यवस्थापन केले जाते.

लागवडीमध्ये सिंचनासाठी १६ मिमीची लॅटरल वापरली आहे. त्यातून ताशी दोन लिटर पाणी प्रतिझाड मिळते. दोन ड्रीपमधील अंतर सव्वा फूट इतके राखले आहे.

एकरी १० ट्रॉली शेणखताची भर जमिनीत घातली होती. तसेच सिंगल सुपर फॉस्फेट ५ गोण्या, जिप्सप चार गोण्या प्रति एकर प्रमाणे मात्रा दिल्या.

रासायनिक खतांचे बेसल डोस एकच वेळेस दिले आहेत. त्यात प्रति एक हजार झाडांना डीएपी, युरिया, पोटॅश एक गोणी व मॅग्नेशिअम सल्फेट १५ किलो याप्रमाणे दिले. उर्वरित अन्नद्रव्यांची पूर्तता ड्रीपद्वारे विद्राव्य खतांच्या माध्यमातून केली जात आहे.

Banana Farming
Banana Variety : ऑस्ट्रेलियाचा आदर्श घ्या

सध्या काही बागांची निसवण पूर्ण झाली आहे तर काही बागा निसवत आहेत.

निसवणीनंतर झाडांना पोटॅशची आवश्यकता असते. यादृष्टीने दर सातव्या दिवशी १५ किलो पोटॅश प्रति एक हजार झाडांना दिले जात आहे. चौथ्या महिन्यापासून बागेला दर पंधराव्या दिवसांच्या अंतराने कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो प्रति एक हजार झाडांना दिले जात आहे.

सूक्ष्म अन्नद्रव्ये ड्रीपद्वारे दिली जात आहे. बागेच्या वाढीच्या अवस्थेनुसार ही खते देण्यावर भर दिला जात आहे.

सरळ खतांचा वापर ड्रीपद्वारे करण्यावर अधिक भर देण्यात आला. गरजेनुसार फॉस्फेरिक खतेही ड्रीपमधून दिली.

सध्या उष्ण हवामान आहे. यामुळे पाच ते सहा तास सिंचन करत आहे. जेणेकरून जमिनीत वाफसा स्थिती कायम राखली जाईल.

केळफूल, घडांवर बुरशीनाशके व कीटकनाशकांच्या प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या जात आहेत. दर पंधराव्या दिवशी ही फवारणी घेतली.

सध्या बागेत केळफूल व फुटवे काढण्याचे काम सुरू आहे. बागेचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी हिरवी नेट लावली आहे. तसेच काही लागवडीमध्ये नैसर्गिक वारारोधक म्हणून उंच वाढणाऱ्या गवताची लागवड बागेच्या पश्‍चिम भागात केली आहे.

दर महिन्याला लॅटरच्या तोट्या स्वच्छ केल्या जात आहेत. कारण सध्याच्या काळात झाडांना व्यवस्थित पाणी मिळणे आवश्यक आहे. म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे.

कीड-रोग व्यवस्थापन

बागेत करपा रोगाचा प्रादुर्भावसाठी दर पंधरा दिवसांनी शिफारशीनुसार रासायनिक फवारणी घेतली.

कुकुंबर मोझॅक या विषाणूजन्य रोगाचे प्रमाण यंदा कमी होते. परंतु त्या संबंधीदेखील प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या आहेत. लागवडीनंतर साधारण १ महिन्यानंतर दर पंधराव्या दिवसांच्या अंतराने प्रतिबंधात्मक रासायनिक फवारण्या घेण्यात सातत्य राखले.

आगामी नियोजन

सध्या बागेत निसवण पूर्ण झाली आहे तर काही भागांत निसवण सुरू आहे. या काळात युरियाचा वापर कमी केला आहे. मात्र पोटॅशची मात्रा व्यवस्थित देण्यावर भर दिला आहे.

घडांवर रसशोषक किडींसाठी प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या जातील. बागेतील फुटवे व केळफूल काढण्यासंबंधी कार्यवाही केली जाईल.

येत्या काळात उष्णतेत आणखी वाढ होईल. त्यामुळे सिंचनाचे काटेकोर नियोजन करण्यावर भर दिला जाईल. निसवण पूर्ण झालेल्या बागेत दररोज आठ तास सिंचन केले जाईल.

घडांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी वाळलेल्या केळी पानांचे आवरण घातले जाईल. जेणेकरून घडांना उष्णतेचा फटका बसणार नाही.

निसवलेल्या झाडांचे केळफूल काढले जातील. उष्णतेमुळे झाड कोलमोडून पडते. यामुळे बागेत पाणी व खतांचे व्यवस्थापन करण्यावर अधिकचा भर दिला जाईल. याशिवाय घडांच्या वजनाने झाड मोडण्याची शक्यता असते. त्यासाठी घड व खांबांना दोऱ्या बांधल्या जातील.

झाडावर फक्त ९ ते १० फण्या ठेवण्यावर भर दिला जाईल. घडांवरील अतिरिक्त फण्या काढून घेतल्या जातील.

नीलेश पाटील ९८२३६९९२३३

(शब्दांकन : चंद्रकांत जाधव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com