
Crop Water Management : दरवर्षी २२ मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघटनेने ब्राझील येथील रिओ डि जनेरो येथे २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते. आपल्याकडील स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे, पाणी साठ्यांच्या शाश्वत संरक्षणाकरिता कार्यरत राहणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे हा संदेश देण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे.
यंदाच्या जागतिक जलदिनाचे ‘हिमनद्या वाचवा, त्यांचे संरक्षण करा’ हे घोषवाक्य आहे. शांततेसाठी पाणी जतन करणे गरजेचे आहे. पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय जीवन नाही हे माहिती असूनही पाणी वापराबाबत कोणीही फारसे गंभीर नाही. गल्लीपासून ते जागतिक पातळीवर विविध ठिकाणी पाण्यासाठी वाद सुरू आहेत. तसे पाहिले तर पाणी हे पुरेसे आहे. परंतु त्याचा वापर, त्याचे व्यवस्थापन काटेकोर नाही, डोळसपणे केले जात नाही.
म्हणून तर त्यामधून नसल्यामुळे वाद निर्माण होतात. पाणी शांतता निर्माण करू शकते किंवा संघर्षाची ठिणगी टाकू शकते. जेव्हा पाण्याचा वाटप असमान होते, त्यावेळी लोकांमध्ये, राज्यांमध्ये, देशांमध्ये तणाव निर्माण होतो. जेथे पाणी आहे, तेथील जीवन सुखमय आहे, त्या भागात समृद्धी आलेली बघावयास मिळते. जेथे पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी, भीषण अवस्था आहे, तेथे समस्या आहेत.
जागतिक जल दिनानिमित्त असा संदेश आहे की, हिमनद्या वाचवा, त्यांचे संरक्षण करा. जागतिक तापमान वाढ कशी कमी कसे करता येईल, वातावरणात कार्बन डायऑक्साइड आणि तत्सम वायूंचे प्रमाण कमी कसे होईल याची काळजी घेणे आवश्यक आहे. रसायने तयार करताना, कोळशापासून वीज तयार करताना बरेच प्रदूषण होते.
पिकाला गरजे इतकेच पाणी देण्याचे नियोजन करावे. पाट पद्धतीने पाणी देताना अजूनही पाणी आणि विजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो, शिवाय दिलेली रासायनिक खते निचरा होऊन वाया जातात. पाणी वापराबाबत कोणीही गंभीर झालेले दिसत नाहीत.
शासनाने याबाबतीत कडक कायदा करण्याची गरज आहे. पाणी हे विनामूल्य उपलब्ध होत असल्याने त्याचे महत्त्व वापर करणाऱ्यांना वाटत नाही. उशीर होण्यापूर्वी सावध होण्याची गरज आहे. सुशिक्षित आणि अशिक्षित देखील पाण्याचा अपव्यय करताना आढळून येत आहे. समृद्धी आणि शांतता पाण्यावर अवलंबून असते. पाणी आपल्याला संकटातून बाहेर काढू शकते.
यासाठी पाण्याच्या संबंधित असणाऱ्या, पाण्याचा वापर करणाऱ्या प्रत्येक घटकाने हे गांभीर्याने समजून घेतले पाहिजे. या मोहिमेमध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग घेतला पाहिजे. प्रत्येक कुटुंबातील लहान, मोठा सदस्य शाळा, महाविद्यालय, खाजगी कंपन्या, सरकारी कंपन्या, कार्यालये, विविध संस्था, शासन यांनी एकमेकांमध्ये संवाद ठेवून पाण्याचा वापर अधिक कार्यक्षमतेने, योग्यतेने कसा होईल, पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी, खबरदारी कशी घेता येईल यावर विचार मंथन, चिंतन केले पाहिजे.
पाण्याची उपलब्धता
जगाचा विचार करता वापरासाठी फक्त ४ टक्के पाणी आपल्याला उपलब्ध आहे. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी ९७ टक्के पाणी समुद्रामध्ये आहे, २ टक्के पाणी बर्फाच्या स्वरूपात उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर उपलब्ध आहे. ०.४ टक्के पाणी १००० मिटरपेक्षाही खोल आहे, ते पाणी खारवट आहे. फक्त ०.६ टक्के पाणी हे गोड पाणी आहे.
आपल्याकडे भूपृष्ठावरील पाणी आणि भूगर्भातील पाण्याचा वापर केला जातो. उपलब्ध पाण्यापैकी ८० टक्के पाण्याचा वापर शेतीसाठी केला जातो, तर उर्वरित पाण्याचा वापर उद्योगधंदे आणि नित्य गरजांसाठी वापर केला जातो.
शेती व्यवसायामध्ये पाण्याचा प्रचंड वापर होतो, तसेच पाण्याचा अपव्ययही होतो. त्यामुळे शेती व्यवसायामध्ये पाण्याचा वापर काळजीपूर्वक होण्याची गरज आहे. खूप जादा पाणी वापर करूनही पिकांचे उत्पादन वाढत नाही, हे अजूनही शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही, हे लक्षात येण्याची गरज आहे. यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पाण्याचा कमी वापर करूनही अधिक उत्पादन आणि अधिक नफा मिळेल.
पाण्याचा अचूक वापर होण्यासाठी स्वयंचलित ठिबक सिंचन तंत्राच्या वापराबरोबर माहिती तंत्रज्ञान, कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरणार आहे. यामध्ये जमिनीतील ओलावा दर्शविणारे सेंसर्स, पानामधील ओलावा दर्शविणारे सेंसर्स आता उपलब्ध झाले आहेत.
शेती व्यवसायाबरोबरीने कारखानदारी, उद्योगधंदे करणाऱ्यांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरला पाहिजे. कारखान्यातून निघालेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्याची यंत्रणा उभारली पाहिजे.
घरगुती वापरात येणाऱ्या पाण्याचा वापराबाबत जनजागृती झाली पाहिजे. पाण्याचा जपून, काटकसरीने वापर करण्यास शिकले पाहिजे. पाणी नसेल तर सर्वांचे अस्तित्व संपण्यास वेळ लागणार नाही. म्हणून पाण्याचा वापर करणाऱ्या प्रत्येक घटकाने आपल्याकडील पाण्याचा कार्यक्षम, काटकसरीने वापर तसेच पाण्याच्या साठ्यांचे संरक्षण करावे.
- डॉ. बी. डी. जडे ९४२२७७४९८१
(वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., जळगाव)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.