
डॉ. सुरेंद्र पाटील, डॉ. नरेंद्र रामटेके
Citrus Orchard Planning : संत्रा, मोसंबी बागेमधून दर्जेदार फळांचे उत्पादन मिळविण्यासाठी प्रत्येक बहराचे शास्त्रीयदृष्ट्या नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. निसर्गत: संत्रा, मोसंबी फळझाडास वर्षातून तीन वेळा बहर येतो. त्यापैकी पावसाळ्यात जून-जुलै महिन्यांमध्ये येणाऱ्या बहरास ‘मृग बहार’ आणि पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या बहरास ‘हस्त बहर’, तर थंडी संपतेवेळी जानेवारी- फेब्रुवारी येणाऱ्या बहरास ‘आंबिया बहर’ म्हटले जाते. असे तीन बहार वेगवेगळ्या ऋतूमध्ये येतात.
संत्रा, मोसंबीची झाडे निसर्गत: थंडीच्या आणि उन्हाळ्याच्या दिवसात कमी- जास्त तापमानामुळे दोनदा विश्रांती घेत असतात. साधारणतः या काळात वातावरण पोषक नसल्यामुळे झाडांवर नवीन वाढ होत नाही. त्यामुळे या विश्रांतीच्या काळात जास्तीचा साखरेचा संचय झाडाच्या ६ ते ९ महिन्यांच्या फांद्यांमध्ये होतो. नवीन वाढीसाठी खर्च होणारा साखरेचा भाग शिल्लक राहून फांद्यांमध्ये त्याचा जास्तीचा संचय होतो. याचा हवामान अनुकूल झाल्यानंतर झाडावर फुले येण्यास उपयोग होतो.
संत्रा, मोसंबी झाडांस येणाऱ्या आंबिया बहाराला ‘नैसर्गिक बहार’ म्हणतात. या बहरात कडाक्याच्या थंडीमध्ये तापमान कमी झाल्यामुळे संत्रा, मोसंबी झाडाची वाढ थांबते. डिसेंबरचा दुसरा आठवडा ते जानेवारीचा दुसरा आठवडा या एका महिन्याच्या कालावधीत रात्रीचे किमान तापमान साधारणतः १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. इतके तापमान कमी झाल्यामुळे झाडांना ताण बसतो. या ताणामुळे झाडे खराब होत नाही.
आंबिया बहर घेण्याकरिता झाडाला ताण देणे
झाडांची सतत होणारी वाढ थांबविण्याकरिता संत्रा-मोसंबी झाडाला पाण्याचा पुरवठा बंद करून ताण दिला जातो. पाण्याचा ताण दिल्यामुळे झाडांची वाढ थांबते. झाडे विश्रांती घेतात. त्यामुळे झाडाच्या फांद्यांत, पानात अन्नद्रव्यांचा संचय होतो.
आंबिया बहर घेण्याकरिता डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा ते जानेवारीचा दुसरा आठवडा या कालावधीत संत्रा-मोसंबी बागेचे ओलित बंद केले जाते. या ताणाचा कालावधी जमिनीचा पोत, झाडाचे वय आणि जमिनीतील उपलब्ध ओलावा यावर अवलंबून आहे.
आंबिया बहरासाठी हलक्या जमिनीत ३५ ते ४५ दिवस, मध्यम जमिनीत ४५-६० दिवस आणि भारी जमिनीत ५५ ते ७५ दिवस ताण द्यावा.
झाडाला ताण बसल्याचे कसे ओळखावे?
बागेस ताण देण्यापूर्वी झाडावरील आधीची सर्व फळे काढावीत. बागेचे पाणी हळूहळू कमी करत आणून नंतर पूर्ण बंद करावे. ताण सुरू केल्यानंतर झाडाच्या पानांचा मूळ रंग कमी होऊन पाने फिक्कट व नंतर पिवळी पडतात. हा बदल होत असताना पाने गळून पडेपर्यंत अन्न तयार करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवतात. साधारणपणे २५ टक्के पानगळ झाल्यास ताण बसला असे समजावे. अशाप्रकारे झाडांना ताण दिल्यास एकाच वेळी फुलोरा येऊन बहरातून दर्जेदार फळे मिळण्याची शाश्वती वाढते.
भारी जमिनीत आंबिया बहर घेण्यासाठी नियोजन
काळ्या जमिनीचा थर हा किमान १.२० मीटरपासून १५ मीटरपर्यंत असतो. या जमिनीमध्ये लागवड केलेली झाडे ताणावर सोडताच, झाडाच्या मुळ्या पाण्याच्या शोधात खोलवर जातात. काळी जमीन ही उत्तम ओलावा टिकवून ठेवणारी असल्यामुळे झाडांना ओलावा मिळत राहतो. त्यामुळे झाडाला ताण बसत नाही आणि ती हिरवीगार राहून वाढत राहतात.
अशा प्रकारची जमीन असलेली बाग संपूर्ण ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांत वखरून साफ ठेवावी. डिसेंबर महिन्याच्या १५ तारखेच्या आसपास झाडांच्या ओळींमधून लाकडी नांगराने नांगरून झाडाच्या मुळ्या उघड्या कराव्यात. त्यामुळे टोकावरील तंतुमुळे तुटून त्यांना ओलावा घेणे शक्य होत नाही. परिणामी झाडांना ताण बसण्यास मदत होते. तसेच क्लोरमेक्वाट क्लोराइड (१००० पीपीएम) १ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारावे. हे कायिक वाढ रोखणारे संजीवक आहे. या संजीवकाच्या फवारणीमुळे झाड नवतीत न जाता फुले येण्यास मदत होते.
वाफे गवताने आच्छादित करणे
झाडांच्या वाफ्यातील ओलावा टिकविण्यासाठी गवताचा ६ सेंमी जाडीचा थर देऊन वाफे आच्छादित करावेत. त्यामुळे ओलावा टिकतोच, शिवाय फळांची गळसुद्धा कमी होते. तसेच जमिनीतील उपयुक्त जिवाणू सक्रिय होऊन अन्नद्रव्य मुळांना सहज उपलब्ध होतात.
अन्नद्रव्यांचे नियोजन
आंबिया बहर घेण्याकरिता संत्रा-मोसंबीची झाडे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ताणावर सोडावीत. ताणावर सोडल्यानंतर चांगले कुजलेले शेणखत प्रति झाड ४० ते ५० किलो प्रमाणे मात्रा देऊन उभी-आडवी वखरणी करावी.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा तापमानात वाढ होताच, हलके ओलित करावे. ताण तोडताना हलक्या ओलिता अगोदर प्रत्येक झाडाला नत्र ६०० ग्रॅम अधिक स्फुरद ४०० ग्रॅम अधिक पालाश ४०० ग्रॅम आणि भरखते द्यावीत. त्यानंतर पाच ते सात दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. तिसऱ्या पाळीला भरपूर पाणी द्यावे.
ताण तोडल्यानंतर २० ते २५ दिवसांनी फुले येण्यास सुरुवात होते. त्यानंतर नत्राचा उरलेल्या (अर्धा) हप्ता एक ते दीड महिन्याने किंवा फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर द्यावीत. हलक्या जमिनीत नत्राची मात्रा तीन ते चार समान हप्त्यात विभागून दिल्यास जास्त फायदेशीर ठरते.
आंबिया बहराची फळे उन्हाळ्यात झाडावर पोसली जातात. त्यामुळे पाण्याचा साठा उन्हाळ्यात उपलब्ध असणे गरजेचे आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्यास फळगळ होते व फळांची प्रत खालावते. म्हणून आंबिया बहार घेताना ओलिताकडे कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे. ओलितासाठी ठिबक पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची बचत होते. जमिनीच्या पोताप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
ओलित व्यवस्थापन :
ठिबक सिंचन पद्धतीने प्रत्येक झाडाला द्यावयाचे पाणी (लिटर प्रति दिवस)
वर्ष जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर
१ ०० ०० ०० ०० ०० ३७ २० १६ १८ १९ १९ १७
२ २३ ३० ४५ ६२ ७५ ४९ २७ २१ २५ २५ २५ २२
३ २७ ३५ ५४ ७४ ९१ ५८ ३२ २५ २९ ३२ २९ २६
४ ३८ ४९ ७६ १०५ १२८ ७१ ३९ ३० ३५ ३९ ३५ ३१
५ ४० ५१ ८० ११० १३४ ७४ ४१ ३१ ३७ ४१ ३६ ३३
६ ४४ ५६ ८७ १२१ १४७ ८१ ४४ ३४ ४१ ४५ ४० ३६
७ ४६ ५९ ९१ १२६ १५४ ८५ ४६ ३६ ४२ ४७ ४२ ३७
८ ५० ६३ ९९ १३७ १६६ ९२ ५० ३९ ४६ ५१ ४५ ४०
९ ५६ ७१ ११० १५२ १८६ १०३ ५६ ४३ ५१ ५७ ५० ४५
१० ६२ ७९ १२३ १७१ २०८ ११५ ६३ ४९ ५७ ६४ ५६ ५०
डॉ. सुरेंद्र पाटील, ९८८१७३५३५३ (पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.