Solapur News : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते.
या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार सर्व शिधापत्रिकाधारकांनी १५ फेब्रुवारीपर्यंत आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केले आहे.
लाभार्थ्यांचे ई-केवायसी करण्याकरिता गावोगावी कॅम्प आयोजित केले आहे. या करिता शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून, अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करावयाचे आहे.
सदरील प्रक्रिया १५ फेब्रुवारीपर्यंत करावयाची असल्याने लाभार्थ्यांनी जवळच्या रास्तभाव धान्य दुकानामध्ये अथवा कॅम्पमध्ये जाऊन आपल्या अंगठ्याचा ठसा व आधार नंबर देऊन ई-केवायसी करावी.
ई-केवायसी केले नाही, तर १५ फेब्रुवारीनंतर धान्य दिले जाणार नाही, याची नोंद घ्यावी, त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी कॅम्पचा लाभ घ्यावा. या संदर्भात सर्व लाभार्थीं व रास्तभाव धान्य दुकानदार यांना १५ फेब्रुवारीपूर्वी १०० टक्के कामकाज पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे यांनी केले आहे.
महिन्याच्या १५ तारखेच्या आत धान्यवाटप करावे
जिल्ह्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकानदारांनी प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेस अन्नदिन साजरा करून लाभार्थ्यांना धान्य वाटप सुरू करावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये दर महिन्याच्या १५ तारखेपूर्वी सर्व लाभार्थ्यांना धान्यवाटप पूर्ण करावे, अशा सक्त सूचना देण्यात येत आहेत.
तसेच वन नेशन वन रेशनकार्डअंतर्गत राज्यातील लाभार्थी नजीकच्या कोणत्याही रास्तभाव दुकानामध्ये जाऊन अन्नधान्याची उचल करीत आहेत. त्या लाभार्थ्यांनी त्याच दुकानामध्ये ई-केवायसी करून घ्यावी. अन्यथा आपल्या गावी रास्तभाव धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी करावी, असे सांगण्यायत आले आहे.
असंघटित कामगारांना आवाहन
केंद्र शासनाच्या ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरीत, असंघटित कामगार ज्यांच्याकडे अद्याप रेशनकार्ड नाही, अशा कामगारांना प्रचलित निकषानुसार विशेष मोहिमेअंतर्गत तातडीने शिधापत्रिका वितरित करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत स्थलांतरीत, असंघटित कामगारांना जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयामध्ये सुरू आहे.
त्यानुसार ज्या व्यक्तीनी स्वत:चे नाव ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत केलेले आहे. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारच्या शिधापत्रिकेचा लाभ घेतला नाही, अशा व्यक्तींनी आवश्यक त्या कागदपत्रांस जवळच्या तहसील कार्यालयामध्ये संपर्क करून शिधापत्रिका प्राप्त करून घ्यावी, असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे यांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.