Farm Ponds : ‘मृद्‍संधारण’च्या दुर्लक्षामुळे शेततळी बनली मृत्यूचे सापळे

Soil Conservation Department : कृषी विभागाच्या योजनेतून राज्यात उभारलेल्या शेततळ्यांमध्ये बुडून मृत्युमुखी पडण्याची सुरू झालेली भयावह मालिका थांबलेली नाही.
Farm Pond
Farm PondAgrowon

Pune News : कृषी विभागाच्या योजनेतून राज्यात उभारलेल्या शेततळ्यांमध्ये बुडून मृत्युमुखी पडण्याची सुरू झालेली भयावह मालिका थांबलेली नाही. सुरक्षिततेचे कोणतेही उपाय नसल्यामुळे या घटना होत असून मृद्संधारण विभागाच्या निगरगट्ट कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.

पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पाबळ तालुक्यात २२ मे रोजी दोन सख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. आर्यन संतोष नवले (वय १३) व आयुष संतोष नवले (वय १०) हे दौंड तालुक्यातील राहू गावचे भावंड पाबळ येथे आजोबांकडे आले होते.

दुसरी घटना दोन दिवसानंतर आंबेगावच्या निडगुरसर येथे घडली. सायली काळू नवले (वय ११), श्रद्धा काळू नवले (१३), दीपक (वय ७, रा. कान्हेवाडी, राजगुरुनगर) आणि राधिका नितीन केदारी (वय १४, रा. कानेवाडी राजगुरुनगर) असे चारही विद्यार्थी शेततळ्यात बुडाले.

Farm Pond
Farm Ponds : वर्षभरात उभारली चौदा हजार शेततळी

राज्यातील शेततळ्यांमध्ये पडून मृत्युमुखी पडल्याच्या आतापर्यंत २०० पेक्षा जास्त घटना झालेल्या आहेत. शेततळ्यांमध्ये पडून मृत्यू होण्याची मालिका गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. जुन्नर येथील ‘सह्याद्री’ गिरिभ्रमण संस्थेने कृषी खात्याला ही समस्या लक्षात आणून दिली आहे.

‘सह्याद्री’चे अध्यक्ष संजय रमेश खत्री व सचिव धनंजय कुलकर्णी यांनी तत्कालीन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदन दिले होते. परंतु आयुक्तालयाने या निवेदनाला केराची टोपली दाखवली. शेततळ्याची सुरक्षा नियमावली कृषी आयुक्तालयाने मुद्दाम कमकुवत ठेवली आहे. दुसऱ्या बाजूला, शेततळ्याची नियमावली तयार करणाऱ्या मृद्संधारण विभागानेही या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे.

Farm Pond
Farm Pond : शेततळे करा, दुष्काळ दूर होईल

शेततळ्यांच्या आत सुरक्षिततेचे कठोर उपाय लागू करावेत; अन्यथा शेततळ्यांमध्ये बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत राहील, असा इशारा ‘सह्याद्री’ संस्थेने दिला होता. परंतु मृद्‍संधारण कार्यालयाने पत्राला केराची टोपली दाखविली.

मे महिन्यात केवळ दोन घटनांमध्ये सहा जणांचा शेततळ्यांमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. “कृषी खात्याला अजून किती मृत्यू बघायचे आहेत, या समस्येबाबत आपण कधी संवेदनशील होणार आहात. आम्ही सातत्याने मागणी करूनही शेततळे सुरक्षा उपाययोजनांची नवी नियमावली कृषी विभाग कधी तयार करणार आहे,” असे संतप्त सवाल या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केले आहेत.

...या नियमांचा आहे अभाव

- शेततळ्याची मोका तपासणी करताना सुरक्षा साधनांची तपासणी सक्तीची नाही

- तळ्याच्या आकारमानानुसार जलतरण तलावांवर वापरल्या जाणाऱ्या ट्यूब, प्लॅस्टिक फ्लोट बसविले जात नाहीत

- तळ्याच्या चोहोबाजूंनी गाठी मारलेले किमान दहा दोरखंड लावले जात नाहीत

- प्लॅस्टिक कागदाच्या उतारावर दोरखंडाची चौकोनी जाळी लावली जात नाही

- तळ्याच्या सर्व दिशांना किमान चार लाइफ जॅकेट कायमस्वरूपी ठेवली जात नाहीत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com