Pune News : देशभरात उष्णतेची लाट पसरली असून अनेक शहरांमध्ये तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. यादरम्यान झारखंडमध्ये वाढणाऱ्या तापमानामुळे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. उष्णतेमुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून बालवाडीपासून आठवीपर्यंतचे सर्व वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हा आदेश सर्व शासकीय, निमसरकारी आणि अनुदानित शाळांना लागू करण्यात आला असून पुढील आदेशापर्यंत तो लागू असेल. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव उमाशंकर सिंह यांनी हा आदेश सोमवारी (ता.२९) जारी केला आहे. तर हा आदेश मंगळवार (ता.३०) पासून लागू करण्यात आला आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने काढलेल्या या आदेशात, हा निर्णय उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये म्हणून घेण्यात आला आहे. यामुळे बालवाडी ते ८ वी पर्यंतचे सर्व वर्ग बंद राहणार आहेत. पण हा आदेश शिक्षकांसाठी नसून शिक्षकांना शाळेत यावं लागेल असे देखील या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उन्हाळी रजा स्वतंत्रपणे देण्यात येतील. यामुळे पार पडलेल्या १ ते ७ वी पर्यंतच्या वार्षिक परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकन करून निकाल लावावेत. दैनंदिन दिनक्रमात समाविष्ट असलेली शाळेची सर्व कामे करावीत असेही येथे स्पष्ट करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे हा आदेश कोणत्याही निवासी शाळेला लागू होणार नसून येथे वर्ग नियमित प्रमाणे भरवले जातील. तर इयत्ता ९ वी वरील वर्ग सकाळी ७ ते ११.३० या वेळेत घेण्याच्या सूचना विभागाकडून करण्यात आल्या आहेत. तसेच यादरम्यान शाळेत प्रार्थना, किंवा कोणत्याही प्रकारचे खेळ किंवा मैदानी स्पर्धा भरवू नये असा आदेश देखील देण्यात आला आहे.
सध्या झारखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान हे ४० अंशांच्या वर गेले आहे. यादरम्यान हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना विशेषतः कोल्हाण आणि संथालसाठी उष्णतेच्या लाटेचा पिवळा अलर्ट जारी केला आहे. तसेच विभागाने लोकांनी सकाळी ९ नंतर उन्हात बाहेर जाणे टाळावे असे आवाहन देखील केले आहे. यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.