
Dharashiv News : काही दिवसांपासून पावसाचा खंड पडलेला असल्याने रब्बीतील वाढीच्या अवस्थेतील सोयाबीन, मूग, उडीद, मका आदी हलक्या प्रतीच्या शेत जमिनीवरील पिकांनी माना टाकण्यास सुरवात केल्याने दुबार पेरणीच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत. त्यामुळे दमदार पावसाची आस लागलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
तालुक्यातील शेती ही प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून, खरिपात प्रामुख्याने सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी मे महिन्यात शेवटी पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली.
कधी नव्हे ते मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात झालेल्या पावसाने परिसरातील पाझर तलाव, बंधाऱ्यांसह नद्याही वाहिल्या; तसेच जमिनीत खोलवर ओल गेल्याने यावर्षी चांगला पाऊस होईल, अपेक्षेने शेतकऱ्यांनी जून महिन्यात चाड्यावर मूठ धरून काळ्या आईची ओटी भरली.
पेरणी केलेली सर्वच पिके जोमाने उगवली. मात्र, यानंतर पावसाने उघडीप दिल्याने वाढीच्या अवस्थेतील पिकांवर परिणाम झाला आहे. अधूनमधून झालेल्या संततधार पावसावर अद्यापपर्यंत पिकांनी तग धरलेली आहे. मात्र, काही दिवसांपासून पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने हलक्या प्रतीच्या शेतजमिनीवरील पिकांनी आता माना टाकण्यास सुरवात केली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांचे वार्षिक खर्चाचे आर्थिक नियोजन हे प्रामुख्याने खरिपाच्या उत्पन्नावरच अवलंबून आहे. मात्र, काही वर्षांपासून कधी अत्यल्प पाऊस, दुबार पेरणी तर कधी अतिवृष्टी, कीडरोगांचा प्रादुर्भाव अशा विविध कारणांनी शेतकरी आर्थिक संकटांचा सामना करत आहेत.
तालुक्यात सर्वसाधारण पेरणीचे एकूण क्षेत्र ४५ हजार ४२५ हेक्टर असून, अद्यापपर्यंत ३९ हजार ५५९ हेक्टरवर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा असून उडीद, मूग, तूर, मका, बाजरी, ज्वारी, ऊस आदी पिकांचीही पेर झालेली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.