Buldana News : जिल्ह्यात यंदा पाऊस सरासरीच्या २२ टक्के कमी झालेला असून जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या नियोजनाची कामे संबंधित यंत्रणांनी वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले.
जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती व दुष्काळ व्यवस्थापनाची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, संजय रायमुलकर, संजय गायकवाड आणि श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, पोलिस अधीक्षक सुनील कडासने उपस्थित होते.
जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या नियोजनाबाबत संबंधित यंत्रणांनी दक्ष राहून उपलब्ध पाण्याचा वारंवार आढावा घेऊन आवश्यकता असल्यास टँकरचे योग्य नियोजन करावे. जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चाऱ्याचे योग्य नियोजन करावे, असे आदेश श्री. वळसे पाटील यांनी दिले.
पिण्यासाठी पाणीसाठा आरक्षित असून, पुढील सहा महिन्यांपर्यंत हे पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले असले तरी अनधिकृत पाणी उपसा मोठ्या प्रमाणात होतो. तो रोखण्यासाठी कारवाई करावी.
जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये जलजीवन मिशन योजनांची कामे वाळूमुळे मागे पडली असून, ती कामे वेगाने पूर्ण करावीत. वाळूअभावी पाण्याच्या टाकीची कामे थांबता कामा नयेत, असे सांगून ते म्हणाले, की केंद्र व राज्य शासनाचे मोठे प्रकल्प सुरू आहेत.
या प्रकल्पांची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत. ही कामे करून घेण्याची मुख्यतः उपविभागीय अधिकारी यांची जबाबदारी असून त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन ही कामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रास्ताविकात खडकपूर्णा प्रकल्पात पुरेशा प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे सिंचनासाठी पाणी देता येणार नसल्याचे सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.