
वडाळी, जि.नंदुरबार ः गाव तंटामुक्त (Dispute free Village), निर्मलग्राम होतात, ग्राम स्वच्छता अभियान (Gram swachhata Abhiyan), दारुबंदी (Ban alcohol) केली जाते. मात्र खऱ्या अर्थाने या योजना कागदोपत्रीच यशस्वी दिसून येतात. जी गावे तंटामुक्त झाली आहेत, त्याच गावात तंटे-भांडणे होत आहेत. त्यांचे भांडण तंटे थेट पोलिस ठाण्यापर्यंत जातच आहेत. त्यामुळे समित्या फक्त कागदावरच राहिल्या आहेत. प्रत्यक्षात गावातील तंटा गावातच मिटवून पोलिस ठाणे पर्यंत वाद पोचवू नये, हा उद्दात हेतू अयशस्वी ठरत असल्याचे चित्र आहे.
स्वच्छता अभियान ,निर्मलग्राम असो किंवा तंटामुक्त गाव अभियान असो, या अभियानासाठी गावोगावी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र या समित्यांचा काहीच उपयोग गावांना होताना दिसत नाही. नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये तशीच परिस्थिती आहे. जिल्ह्यातील १२ पोलिस स्टेशन अंतर्गत ९८४ गावे व ५९५ ग्रामपंचायती येतात. यापैकी आतापर्यंत ३१९ गावे तंटामुक्त झाली असून, अद्याप २७६ गावे बाकी आहेत. तंटामुक्त योजना ग्रामीण भागात राबवण्यात आली, गाव तेथे समित्या नियुक्त करण्यात आल्या असल्या तरी आज गावात कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत भांडणे होताना दिसतात. त्यामुळे तंटामुक्त समित्यांचा माध्यमातून पोलिसांचे काम कमी करण्याचा उद्देशासोबतच नागरिकांचे पैसे, वेळ वाचविण्याचा उद्दात हेतू शासनाचा आहे. मात्र तसे दिसून येत नाहीत.
३१९ गावे ही गेल्या तीन वर्षापुर्वीच तंटामुक्त झाले आहेत. काही महिने त्याची अंमलबजावणी योग्य झाल्यानंतर समित्याही सुस्तावल्या व प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले. त्यामुळे अद्यापही २७६ गावे तंटामुक्तीपासून लांबच आहेत. एवढेच नव्हे तर तंटामुक्त गावातही तंटे -वाद वाढले आहेत. त्यामुळे पोलिसांवरचा ताण जैसे थे आहे. तंटामुक्तीचा पुरस्कार गावाला प्राप्त झाल्यावर गावातील पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. त्यामुळे तंटामुक्त समित्या कागदावरच दिसून येत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.