
गेल्या शंभर वर्षांत बोली भाषेमध्ये आणि माणसांच्या बोलण्याच्या तऱ्हांमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल झालेला आढळतो. असे म्हणतात की भाव व्यक्त करण्यासाठी आदी माणसे तोंडातून काही शब्द उच्चारत असत. अशा उच्चार केला गेल्या शब्दांना चिन्हे दिली गेली. अशा अनेक चिन्हांतून भाषेचे लिखाण सुरू झाले. अंदाजे ५० हजार वर्षांपूर्वी वेगवेगळ्या मानव समुदायांमध्ये भाषेमधील शब्द तयार होऊ लागले होते. सुमारे दहा हजार वर्षापूर्वी ते शब्द निरोप देण्याचे साधन म्हणून वापरले जावू लागले. ‘भाषा’ म्हणजे बोलणे यावरून भाषा ही व्याख्या निर्माण झाली. एका कुटुंबामध्ये बोलली गेलेली, एका गटामध्ये बोलली गेलेली, एका क्षेत्रामध्ये बोलली गेलेली भाषा म्हणजे कुटुंब बोली, गट बोली, प्रांत बोली ठरली.
दर बारा कोसांवर भाषा बदलते असे म्हणतात. जरी राज्यभर शालेय पुस्तके एकाच भाषेत असली तरी स्थानिक भाषेचा स्पष्टपणे प्रभाव दिसून येतो. त्यातून त्या त्या ठिकाणच्या बोली भाषेमध्ये उच्चार, शब्द, वाक्प्रचार, यामध्ये सतत बदल होत राहतो. १०० वर्षांपूर्वीची मराठी पुस्तके वाचली तर प्रमाण भाषेमध्ये शिकलेल्या आधुनिक पिढीतील मुलांना त्यातील बरेच शब्द कळणार नाहीत अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये नागपुरी, वऱ्हाडी, अहिराणी, खानदेशी, मालवणी, कोकणी, मराठवाडी, झाडीबोली, करवडी, मराठी, अशा अनेक बोली भाषा बोलल्या जातात. आदिवासींमध्ये सुद्धा गोंड, कातकरी, भिल्ली, कोरकू पावरा, कोकणी, मावची, माडीया आदी प्रमुख बोली भाषा आहेत. गोंड बोली ही सर्वाधिक बोलली जाणारी बोली भाषा आहे व तिला स्वतंत्र लिपीसुद्धा आहे. त्याचे पुरावे सुद्धा सापडले आहेत. भिल्ली बोली भाषा गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये बोलली जाते. भुसावळ, जळगाव, रावेर भागात बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतून दिसणारी तावडी बोली बोलली जाते. उत्तर मध्य किनारपट्टीत आग्री बोली बोलली जाते तर कर्नाटकला लागून असणाऱ्या चंदगड भागात चंदगडी बोली भाषा बोलतात. ही कोकणी व कन्नड भाषेच्या प्रभावाने तयार झालेली बोली भाषा आहे.
जनगणनेनुसार भारतात मराठी, बोलणाऱ्यांची संख्या दहा कोटीवर आहे. मराठी जगातली १९ व्या क्रमांकाची भाषा आहे. छोट्या छोट्या जमातींची सुद्धा त्यांच्यामध्ये बोलण्याची भाषा आहे. भौगोलिक क्षेत्र सोडून त्या त्या जाती-जमातीमध्ये त्यांची जी बोली भाषा बोलली जाते त्या समूहानुसार शेकडो उपप्रकार पडतात. पावस (कोटली), नाथपंती, गामती, गामीतह (लाड), कोलामा खदुखनी, माडिया, मीरज, दखनी धामी, भिल्ली (खानदेश), कातकरी, कोटाली, गोला, कुचकोवेरी, भिल्ली निमार, मायवाडी, वारली, छप्परबंद, मांग गारुडी, म्हलार, जीप्सी बोली बजार, बागलाणी, कोकणा, घिसाडी, कोल्हारी, उर्दू मेहाली, गोसावी, म्हलार, कैकाडी, आगरी, गोंडी, जुवा, अहिराणी, डांगी, माहामा सिक्की, गुजरी, हलबी, पावरा, मठवाडी, नंदीवाले, चितोडीया, लेया पालीदार, कुडाळी, कोकणी, नंद भाषा, बदाडी, कोल्हापुरी, वाडवळी, नारायणी, बेळगावी, इत्यादी अनेक बोली भाषा बोलल्या जातात. सहजपणा व सोपेपणा हीच बोली भाषांची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी बोलल्या जात असलेल्या भाषा शब्द सोडून काही विशिष्ट भागामध्ये बोलण्याची एक विशिष्ट शैली पण दिसून येते.
अहमदनगरच्या काही भागात पहिल्यांदा प्रश्न विचारून आलेले उत्तर हेच प्रश्न म्हणून विचारण्याची पद्धत आहे
उदाहरण : पहिला : येऊ का? काय करताय?
दुसरा : जेवण करतोय या जेवण करायला!
पहिला : जेवताय व्हय?
तर कुकडी आणि घोड नदीच्या मधल्या बेटातल्या दहा-पंधरा गावांमध्ये प्रश्न विचारण्यात चॅलेंज करण्याची पद्धत आहे. पहिल्यांदा प्रश्न विचारणाराच उत्तराला चॅलेंज करतो.
उदाहरण : पहिला : कुठे चालला आहे?
दुसरा : बँकेत चाललो आहे कर्ज काढायचे आहे!
पहिला : कसलं डोंबल्याचं कर्ज काढतोय?
पहिला : कुठे निघाला?
दुसरा : बाजाराला.
पहिला : कसला बाजार करतो?
शाळा, नोकरी, दुकानात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्ती बाबतीत सुरुवात आणि शेवट अशाच पद्धतीने होतो.
भारताच्या लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या १९०३ ते १९२३ नुसार भारतात त्या वेळी १७९ भाषा व ५४४ बोली होत्या. १९६१ च्या जनगणनुनेसार १६५२ भाषा बोलल्या जात होत्या. सुमारे २०० भाषा भारतात संपुष्टात येण्याच्या स्थितीला आहेत. महाराष्ट्राच्या वैभवामध्ये या बोली भाषेने अतिशय रंगत आणलेली आहे. मराठी साहित्य, मराठी सिनेमा, मराठी वृत्तपत्रे, त्या त्या भागातील स्थानिक नेतृत्व आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवनात याच बोली भाषांनी रंगत आणलेली आहे. बोली भाषा संपल्या तर मूळ भाषेवर त्याचा आघात होईल हे भाषा तज्ज्ञ सांगतात, ते काही खोटे नाही. भाषा टिकली तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर समाज आणि त्यातील मूल्यव्यवस्था टिकेल हे स्पष्टच आहे. जगण्यातली रंगत जाईल ती वेगळीच. नाही तरी... डोंगार, झाडी, हाटील यातली ती रंगत कायमस्वरुपी गमावून कसे चालेल?
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.