Maharashtra Corruption Scandal: घोटाळा, कथित भ्रष्टाचार प्रकरण भोवले

Dhananjay Munde Resignation: कृषी विभागातील भ्रष्टाचार, पीकविमा घोटाळा आणि संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या पार्श्वभूमीवर अखेर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. विरोधकांनी मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी केली असून, हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा देणारे ठरले आहे.
Dhananjay Munde
Dhananjay MundeAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: सदसद्‌विवेक बुद्धीला स्मरून आणि प्रकृती ठीक नसल्याने सांगत अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. मात्र देशमुख हत्या प्रकरण, कृषी विभागातील बदल्या, निविष्ठा घोटाळा, पीकविमा घोटाळा आणि बीडमधील जिल्हा नियोजन समिती निधीचा भ्रष्टाचार भोवला आहे.

परळी मतदारसंघातून २०१९ मध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करत विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर मुंडे मंत्री झाले. त्यामुळे त्यांचा वाल्मीक कराड हा निकटवर्तीय भलताच सुसाट सुटला. बीड जिल्ह्याचा बिहार झाला आहे. तेथे अधिकारी काम करण्यास तयार नसल्याच्या चर्चा असत, मात्र त्याचे विदारक रूप कधी समोर आले नाही.

मुंडे हे बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर सर्व सूत्रे कराडच्या हाती असल्याचा आरोप विरोधक आणि स्वपक्षातील नेत्यांनी केला आहे. संदीप क्षीरसागर, नमिता मुंदडा, सुरेश धस यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींना जिल्हा नियोजन समितीच्या निधीत पक्षपात केल्याचाही आरोप होत होता. अनेक कामे केवळ कागदोपत्री दाखवून निधीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप धस यांनी केला. त्याची कागदपत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आली.

मुंडे कृषिमंत्री झाल्यानंतर कृषी आयुक्तालय आणि राज्यातील विविध पदांच्या बदल्यांबाबत मोठा व्यवहार झाल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला. बदल्यांचे रेट कार्डच जाहीर केले होते. काही पदांवर एकाच वेळी दोन नियुक्त्या केल्या होत्या. मुंडे यांच्या अल्प कालावधीत अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार, व्ही. राधा यांच्यासह कृषी आयुक्त प्रवीण गेडाम आणि रवींद्र बिनवडे या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या होत्या.

Dhananjay Munde
Agriculture Department Scam: ‘गुणनियंत्रण’चे अवगुण

राज्य सरकारचे डीबीटी धोरण बदलून स्प्रे पंप, नॅनो युरिया, डीएपी, कॉटन बॅग वाटप करण्यात आले. या निविष्ठा बाजारभावापेक्षा जास्त भावाने खरेदी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. २५० ते ३०० कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचा आरोप सुरेश धस यांच्यासह अंजली दमानिया यांनी केला होता. या प्रकरणावर न्यायालयातही सुनावणी झाली. मात्र कृषी विभागाने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे.

एक रुपयातील पीकविम्याची वासलात

एक रुपयात पीकविमा योजना आणल्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात बोगस पीकविमा काढण्याची स्पर्धा बीड जिल्ह्यात समोर आली. या प्रकरणी हिवाळी अधिवेशनात गावनिहाय आणि नावानिशी पीकविमा घोटाळ्याची दाहकता धस यांनी मांडली होती.

देशमुख यांच्या हत्येचे क्रौर्य

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची वाल्मीक कराडच्या गुंडांनी क्रूर हत्या केली. त्या हत्येमागे अवादा कंपनीकडे मागितलेली खंडणी हेच प्रमुख कारण होते. या कंपनीकडे खंडणीसाठी गेलेल्या कराडच्या गुंडांना देशमुख यांनी विरोध केला. मात्र देशमुख यांचे अपहरण करून क्रूर हत्या केली. हत्येनंतर राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यांना पकडण्यात आले. संतोष आंधळे हा संशयित अद्याप फरार आहे.

तर कराड याला अटक करण्यासही टाळाटाळ होत होती. कराडला खंडणी प्रकरणात अटक केली, मात्र देशमुख हत्या प्रकरणात त्याला सहीसलामत बाहेर काढण्यासाठी प्रचंड आटापिटा करण्यात आला. अखेर तांत्रिक तपासातून मकोका अंतर्गत त्याला अटक करण्यात आली. वरवर पाहता हे प्रकरण स्थानिक पातळीवरील वाटत असले, तरी मंत्रिपद वाचविण्यासाठी मुंडे यांच्या दिल्लीला झालेल्या दोन फेऱ्या नेमक्या कशासाठी होत्या याची चर्चा आता सुरू आहे. ज्या कंपनीकडे खंडणी मागण्यात आली होती ती दिल्लीतील एका बड्या नेत्याशी संबंधित असल्याचेही सांगण्यात येते.

Dhananjay Munde
Dhananjay Munde Resignation : ...शपथ घ्यायला नको होती; मंत्री पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया

या खंडणीप्रकरणातील बैठक मुंडे यांच्या मलबार हिलवरील सरकारी निवासस्थानात झाली होती, असा दावा धस यांनी केला होता. त्यामुळे मुंडे यांचा राजीनामा अटळ होता. तरीही त्यांनी शेवटपर्यंत आटोकाट प्रयत्न केला. माजी मंत्री छगन भुजबळ, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह अन्य नेत्यांनी त्यांची पाठराखण केली. मात्र देशमुख हत्या प्रकरणाची छायाचित्रे समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. मात्र ही छायाचित्रे सरकारी दस्तऐवज असतानाही ती कशी बाहेर आली याबाबतही चर्चा सुरू आहे.

मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर सुरेश धस, राष्ट्रवादीचे रोहित पवार, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाले आहेत. देशमुख हत्या प्रकरणात त्यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सातपुडा बंगल्यावर खंडणीप्रकरणी झालेल्या बैठकीची चौकशी करून नोकरांसह अन्य लोकांचे जबाब घ्यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

नैतिकतेच्या आधारे राजीनामा : राष्ट्रवादी

धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रक काढून नैतिकतेच्या आधारे मुंडे यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. गैरकृत्याला किंवा कोणत्याही गुन्ह्याला आमच्या पक्षात समर्थन नाही. आजच्या घटनेतून हाच संदेश गेला आहे. धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध आहे असे तपासात समोर आलेले नाही. मात्र नैतिकतेच्या मुद्द्यावर एक जबाबदार राजकीय नेता म्हणून मुंडे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही पत्रकात म्हटले आहे. मात्र राजीनाम्यात नैतिकतेचा ‘न’ ही नसल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com