Biodiversity Conservation: देवराया : जैवविविधता जोपासणारी व्यवस्था

Forest Conservation : एकीकडे संरक्षित वने वाढविण्यावर खर्च करायचा, आदिवासींच्या प्रदेशावर निर्बंध घालायचे, तर दुसरीकडे ज्यांनी श्रद्धा, संघटित इच्छाशक्ती आणि स्वनियंत्रणाच्या जोरावर या देवराया वर्षानुवर्षे जोपासल्या त्यांचा नाश करायचा, असा दुटप्पीपणा चालू आहे.
Save Devari
Save DevariAgrowon
Published on
Updated on

Palghar News: महाराष्ट्रातील देवराया म्हणजे देवाच्या नावाने राखलेले जंगल. या जंगलावर फक्त देवाचेच राज्य असते. अर्थात देवाचे म्हणजे निसर्गाचेच राज्य असते. ही फक्त देवाची संपत्ती असते. यामधील कोणत्याही फळावर, लाकडांवर माणसाचा अधिकार नसतो. त्यामुळे कोणतेही झाड कापले, तोडले जात नाही. अगदी साधी काटकी किंवा गवतही त्या देवराईबाहेर नेले जात नाही.

देवराईमध्ये देवाचे एखादी देऊळ असते. आजूबाजूच्या गावातील माणसे त्या देवळात दर्शनापुरती जातात. देवाचा कोप होईल या अंधश्रद्धेपोटी देवराईतील निसर्गाला इजा पोहोचेल, असे कोणतेही कृत्य केले जात नाही.

Save Devari
Maharashtra Biodiversity: जैवसमृद्ध महाराष्ट्र: पशुधनात प्रत्येक भूप्रदेशाची वेगळी खासियत

पण आता मानव शहाणा झाला आहे. देव कोप या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, हे ज्ञानी म्हणा वा सुशिक्षित म्हणा माणसाला जाणवले आहे. एवढी मोठी नैसर्गिक साधन संपत्ती उपभोगाशिवाय व्यर्थ जाते आहे, असे मानवांना वाटते आहे. त्यामुळे आता या देवरायांचे रूपांतर पर्यटन स्थळांमध्ये करायला सुरुवात झाली आहे.

देवरायांमध्ये असलेल्या जुनाट मंदिराचे नूतनीकरण करून त्यांना चकचकीत केले जात आहे. भाविकांना तिथे वाहनांनी पोहोचणे सुलभ व्हावे म्हणून त्या देवरायांमधून प्रशस्त रस्ते तयार करण्याच्या योजना होत आहेत.

Save Devari
Book Review: निसर्ग समजाविणारे देवराई आख्यान

कालांतराने मंदिराच्या आसपास दुकाने लागतील. जंगलातील शांतता आणि सौंदर्य अनुभवण्यासाठी विश्रामगृहे तयार होतील. हा कल्पनाविलास नाही. बाहेरचे जग बघून परतलेल्या काही गावकऱ्यांनी त्यांच्या देवरायांमधील पडीक मंदिराचा जीर्णोद्धार करायचे ठरवले आहे. आपल्या गावचे रूपांतर पर्यटन स्थळात करण्याच्या कल्पनेने त्यांना झपाटलेले आहे. त्या गावानेही तसा ठराव केल्याचे कळते.

म्हणून रोजगाराच्या संधी तयार होतील. पण माझ्या अनुभवाप्रमाणे ते रोजगार परप्रांतीय मिळवतील आणि स्थानिक पुढारी मलिदा खातील. देवराईमधील साधे पानही तोडणे पाप समजले जात होते. त्या जंगलातील आता सुशिक्षित लोक विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल करतील.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील पंधराशे देवराया आता जवळ जवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वी देवराया देवाच्या मालकीच्या होत्या पण आता बहुतेक देवरायांवर महाराष्ट्र शासनाचा अधिकार निर्माण झालेला आहे. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी धरणे, रस्ते, खनिज संपत्ती ह्यासाठी देवरायांचे लचके तोडले जात आहेत. काही वर्षांनंतर त्यांचे अस्तित्वच उरणार नाही, असे वाटते.

एकीकडे संरक्षित वने वाढविण्यावर खर्च करायचा, आदिवासींच्या प्रदेशावर निर्बंध घालायचे, तर दुसरीकडे ज्यांनी श्रद्धा, संघटित इच्छाशक्ती आणि स्वनियंत्रणाच्या जोरावर ह्या देवराया वर्षानुवर्षे जोपासल्या त्यांचा नाश करायचा, असा दुटप्पीपणा चालू आहे. या देवराया म्हणजे नुसतीच उगवलेली झाडे नाहीत तर जैवविविधतेला आश्रय देणारी, जोपासणारी व्यवस्था आहे, एवढे तरी भान ठेवावे.
शशिकांत काळे, वाकी, ता. डहाणू, जि. पालघर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com