
Nahsik News : व्याजमाफीसाठी आग्रही असलेल्या थकीत कर्जदारांचा विरोध बाजूला सारत कृषी मंत्री अॅड.माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन कर्ज सामोपचार परतफेड (ओटीएस) योजनेचा ठराव मंजूर केला.
शासनाने कर्जमाफी किंवा व्याजमाफी केल्यास शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम परत मिळेल. पण, नवीन योजनेनुसार कर्जदारांना तीन टप्प्यांत दोन ते सहा टक्के व्याजासह मुद्दल द्यावी लागेल. राज्य शासन आणि ‘नाबार्ड’च्या मंजुरीनंतर या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे.
कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे व जिल्हा बँकेचे संस्थात्मक सल्लागार विद्याधर अनास्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (ता. ४) जिल्हा बँकेची विशेष सर्वसाधारण सभा महाकवी कालिदास कलामंदिर येथे झाली. जिल्हा बँकेचे प्रशासक संतोष बिडवई अध्यक्षस्थानी होते. विभागीय सहनिबंधक संभाजी कदम, जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिंदे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक ए. के. पाटील उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी सभासदांचे तालुका प्रतिनिधी निवडण्यावरून गोंधळ झाला. प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रियाच सभासदांनी उधळून लावली सभासदांचा रोष बघता विद्याधर अनास्कर यांनी बँकेची सद्यःस्थिती असल्याने त्यादृष्टीने ही योजना आणल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासक बिडवई यांनी नवीन ‘ओटीएस’ योजनेचा ठराव मांडला.
कर्जदारांना ३० सप्टेंबर २०२५पर्यंत फक्त दहा टक्के रक्कम भरावी लागेल. त्यानंतर महिनाभरात १५ टक्के आणि ३१ मार्च २०२६ पूर्वी उर्वरित ७५ टक्के रक्कम भरण्याची संधी दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच चक्रवाढ व्याज आकारणी होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
येवल्याचे सभासद संपत कदम यांनी या योजनेचे स्वागत केले.परंतु, जिल्हा बँक ही विविध कार्यकारी सोसायट्यांकडून जास्त व्याजाची आकारणी करणार नाही, याची हमी देण्यास सांगितले शासनाला कर्जमाफी देता येत नसेल, तर किमान व्याज तरी माफ करावे यासाठी विंडोरीचे प्रकाश शिंदे यांनी आग्रह धरला. त्यांच्यासह शेतकरी, थकबाकीदार व ठेवीदारांनी व्यासपीठासमोर गर्दी केली.
त्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर अनास्करांनी माइकचा ताबा घेतला आणि त्यांनी कर्जमाफी आणि व्याजमाफीच्या निर्णयाविषयी मत मांडले. राज्य शासनाने कोणताही निर्णय घेतला तरी शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत दिले जातील.
परंतु, राज्य शासनाला एका बँकेसाठी हा निर्णय घेता येणार नाही. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला जाईल, असेही त्यांनी सांगितले. कर्जमाफी व व्याजमाफीवरून शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात येताच कृषिमंत्री अॅड. कोकाटे यांनी नवीन कर्ज सामोपचार योजनेच्या ठरावास मंजुरी घेतली आणि सभेचे कामकाज संपवले.
नवीन 'ओटीएस' योजना अशी
कर्ज व्याज
(टक्के) सभासद
एक लाखापर्यंत २ २१ हजार
पाच लाखांपयत ४ १९ हजार
दहा लाखांपर्यंत ५ २१८२
दहा लाखांवरील कर्ज ६ १०३२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.